– जिल्ह्यातील पाच एपीआय दर्जाच्या अधिकार्यांच्या विनंती बदल्या!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्ह्यातील पाच सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (एपीआय) विनंती बदल्या केल्या असून, त्यात अंढेरा पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी विकास पाटील यांची नियुक्ती झाली आहे. श्री पाटील हे यापूर्वी बोराखडी पोलिस ठाणे येथे ठाणेदार होते. अंढेरा येथे आपली कारकीर्द गाजविणारे गणेश हिवरकर यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे. अंढेरा हे संवेदनशील पोलिस ठाणे असून, हिवरकर यांनी या ठाण्याचा कारभार अत्यंत चांगल्याप्रकारे सांभाळला होता. एक डॅशिंग व प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. नवे ठाणेदार पाटील हे शुक्रवारी (दि.७) आपला पदभार स्वीकारतील.
देऊळगावराजा तालुक्यातील महत्वाचे असणारे अंढेरा पोलिस ठाणे हे संवेदनशील पोलिस ठाणे आहे. विद्यमान ठाणेदार गणेश हिवरकर यांची ३ जुलैरोजी बुलढाणा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर विकास पाटील यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बदली केली आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५० गावे असून, त्यातील दोन गावे ओसाड आहेत. पाच बीटच्या माध्यमातून या पोलिस ठाण्याचा कारभार चालतो. सद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख वाढलेला असून, जातीय दंगलीच्या घटनाही घडल्या होत्या. तथापि, ठाणेदार गणेश हिवरकर यांनी आपला दरारा निर्माण केला होता. ठाणेदार विकास पाटील यांनीही यापूर्वी बोराखडी ठाण्यात चांगली कामगिरी केली असून, शिस्तीचे व प्रामाणिक, कष्टाळू अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख आहे.
या पोलिस अधिकार्यांच्या झाल्या विनंती बदल्या..
धाड पोलिस ठाण्याचे एपीआय सचिन पाटील यांची अमडापूर पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. मेहकरचे एपीआय अमरनाथ नागरे यांची डोणगाव पोलिस ठाणे, एपीआय विकास पतिंग पाटील यांची अंढेरा येथे ठाणेदारपदी, एपीआय वैâलास चौधरी यांची जळगाव जामोद पोलिस ठाण्यातून हिवरखेड पोलिस ठाणे येथे, तर एपीआय दुर्गेश राजपूत यांची एमआयडीसी मलकापूर पोलिस ठाण्यातून रायपूर पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. तर मलकापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार मलकापूर शहरच्या ठाणेदार एपीआय स्मिता म्हसाये यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
————-