Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

गद्दारांचे आव्हान परतवून लावणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले!

– शिंदे गटासह, फडणवीस, मोदींवर उद्धव ठाकरे यांचे जोरदार टीकास्त्र!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – काही मिंध्यांनी, गद्दारांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. हे आव्हान तुमच्या साथीने परतवून लावू. हे आव्हान मोडून काढल्यानंतर शिवसेनेला आव्हान देणारा शत्रूच शिल्लक राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ठणकावले. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षणमुखानंद सभागृहात राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांच्या अफाट जल्लोषात पार पडला. यावेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की मिंधे म्हणतात की नरेंद्र मोदी म्हणजे सूर्य, त्यांच्यावर थूंकू नका, अरे मग तुमचा सूर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे का प्रकाश पाडत नाही? नरेंद्र मोदींनी जर कोरोनाची लस बनवली असेल तर ते ब्रम्हांडही चालवतील, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. काल फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला. त्यात त्यांनी आज आपण जीवंत आहोत ते मोदीजींनी तयार केलेल्या लसीमुळे, असे म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले की, मोदीजींनी लस तयार केली असेल तर संशोधक काय गवत उपटत बसले होते का? अशा लोकांनी समीर चौगुलेंच्या दवाखान्यात मानसिक उपचार करायला पाठवले पाहिजे, अशी टोलेबाजीही ठाकरे यांनी केली.


कार्यकर्त्यांना आवाहन करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज दिलेले आव्हान आपल्यातल्या हरामखोरांनी दिलेले आहेच पण आपल्या एकेकाळच्या मित्रानेही दिलेले आहे. आव्हान देणारा शत्रू आता ठेवायचा नाही, हेच आपले शेवटचं आव्हान असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना नमोहरम करण्याचे चॅलेंज दिले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!