सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राजकारणामध्ये कुणाची चाटूगिरी करून किंवा कुणाची चापलुशी करून आम्हाला आमदार, खासदार व्हायचे नाही. राजकारणातील सत्तेचा वाटा आम्हाला सन्मानाने हवा असल्याचे मत प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
गीत गायनाच्या माध्यमातून पुढे बोलताना येरेकर म्हणाले, सन्मानाची सत्ता हवी असेल तर शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. परंतु आजचे आपले राजकीय पुढारी हे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना येथे जाऊन सर्कस मधील वाघ झाले आहेत. अशी लाचारी सत्ता आम्हाला नको आहे. त्यासाठी राजकीय चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आज समाजावर आली आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे समाजाने उभे राहिले पाहिजे. भलेही आपला उमेदवार पडू द्या, परंतु आपली ताकद दाखविणे ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांनी सर्वांना मताचा अधिकार दिला परंतु या मताचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. दारू, मटण, पैशासाठी आपले मत विकू नका. महिलांना ही ५० टक्के राजकारणामध्ये आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा महिलांनी योग्य वापर करून मनुवाद्यांना हद्दपार करा. हीच काळाची गरज असल्याचे ही याप्रसंगी प्रबोधनाच्या माध्यमातून येरेकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष – श्रीशैल गायकवाड, शहर अध्यक्ष- प्रशांत गोणेकर, तुकाराम पारसे, जालिंदर चंदनशिवे, रविंद्र थोरात, गौतम बनसोडे, जिल्हा महासचिव- अनिल वाघमारे शंकर शिंदे, विजयानंद उघडे, गौतम थापटे, बाबूराव सावंत भाईराजा सोनकांबळे पल्लवी सुरवसे, मंदाकिणी शिंगे, आशालता आवाड, सविता कांबळे, हेमा वाघमारे, विजय गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते आदी उपस्थित होते.
————-