सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रेसमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सीईओ दिलीप स्वामी, व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदे मध्ये मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी मनीषा आव्हाळे यांच्या नावाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यापूर्वी वाशिमचे शहाजी पवार यांच्या नावाची ही चर्चा होती. पण सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही आव्हाळे यांची शिफारस केली असल्याची उडत माहिती मिळत आहे.
त्यामुळे सीईओ स्वामी यांची बदली झाल्यास सोलापूर जिल्हा परिषद सीईओ पदावर प्रशासक म्हणून मनीषा आव्हाळे यांच्याकडे पदभार येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या मनीषा आव्हाळे या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आदिवासी विभागाचा देखील पदभार आहे. जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपला असून आता झेडपीच्या सीईओ पदावर नियुक्ती होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेमध्ये होऊ शकते. यापूर्वी सीईओ दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले असता त्यांनी काही दिवस जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळला होता. त्यामुळे आव्हाळे यांची शासनाकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर कोणाची नियुक्ती होणार हे सांगणे अशक्य आहे.
जिल्हाधिकारी यांच्यादेखील बदलीची हालचाल!
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे गेल्या तीन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या देखील बदलीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौर्यावर आले असताना शंभरकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. ते मुंबईत असल्याचे सांगण्यात येत असून बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राज्य शासनाकडून वरिष्ठ अधिकार्यांच्या बदलीच्या प्रक्रियेस लवकरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.