आदित्य ठाकरेंसह १६ आमदारांना अपात्र घोषित करा!
शिंदे गटाने बजावलेला व्हीप (पक्षादेश) न पाळल्याचा आरोप
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेतील राजकीय संघर्ष काही थांबण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा आदेश (व्हीप) पाळला नाही, म्हणून माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाचे प्रतोद भारत गोगावले यांनी नव्या विधानसभा अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे, की या १६ आमदारांनी पक्षादेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांची विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात यावी. अध्यक्षांनी हे पत्र स्वीकारले असून, त्यावर विचार करून कळवतो, असे गोगावले यांना सांगितले. दुसरीकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटानेदेखील पक्षादेश न पाळणार्या बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्षादेश पाळला नसून, त्यांच्याविरोधात कारवाई प्रस्थापित केली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली आहे. बंडखोरांपैकी १६ आमदारांच्या सदस्यत्व रद्दचा तंटा सद्या सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. १६ बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाने यापूर्वीच उपसभापतींकडे केलेली आहे. तर त्याला बंडखोर गटाने सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरती स्थगिती मिळवलेली आहे.