बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कापूस, सोयाबीनला हमीभाव, पीकविम्याचे पैसे द्यावे, यासह इतर रास्त मागण्यांसाठी आंदोलन करणार्या शेतकर्यांवर पोलीस प्रशासनाने लाठीमार करत, त्यांना तुरुंगात टाकले. या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यात काल, १५ फेब्रुवारीरोजी एकाच दिवशी जिल्हा काँग्रेसच्या आदेशानुसार, तालुकास्तरावर निषेध आंदोलन करण्यात येवून दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
कापूस, सोयाबीनला योग्य भाव द्यावा, पीकविम्याचे पैसे त्वरीत खात्यात जमा करावे, अतिवृष्टीच्या नुकसानीचा मोबदला द्यावा, यासह इतर रास्त मागण्यासाठी ११ फेब्रुवारीरोजी शेतकरी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करित होते. मात्र पोलीसांनी शेतकरी व आंदोलकावर लाठीचार्ज करित गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात ड़ांबले, असा आरोप करत, या घटनेचा निषेध करण्यासाठी व गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंन्द्रे यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यात एकाच दिवशी मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा, शेगाव, खामगाव, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकरसह आदि ठिकाणी आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे श्लोकानंद ड़ांगे यांनी कळविले आहे.