– मजबुतीकरण, डांबरीकरण करून रस्ते एकमेकांना जोडण्याचा मार्ग मोकळा
– चिखली तालुक्यातील तब्बल ३५३ किलोमीटरचे ग्रामीण रस्ते दर्जोन्नत करून गावे एकमेकांशी पक्क्या रस्त्याने जोडली जाणार
चिखली (विनोद खोलगडे) – चिखली तालुक्याच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी तालुक्यातील योजनाबाह्य रस्त्यांचा ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजनेत समावेश करण्यात यश मिळवले असून, या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी झाला आहे. या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने मंगरूळ ते शेळगाव आटोळ, मिसाळवाडी ते शेळगाव आटोळ, अंचरवाडी ते डोड्रा, अंचरवाडी ते भरोसा, अंत्री खेडेकर ते तपोवन देवी, शेलगाव आटोळ ते अमोना यासह सुमारे ९५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवली असून, एकूण ३५३ किलोमीटरचे ग्रामीण रस्ते चालू वर्षात मार्गी लागणार आहेत.
गाव खेड्यातील असलेले हे रस्ते योजनाबाह्य असल्याने या रस्त्यांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारे मंजुरी व निधी मिळत नव्हता. त्यामुळे हे रस्ते दर्जेन्नत करण्यात यावे, अशी मागणी पुढे आली होती. याप्रश्नी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा चालविला होता. जी गावे श्वेताताईंच्या मतदारसंघात नाहीत, अशी मिसाळवाडी, शेळगाव आटोळ या गावांतील रस्त्यांसाठीही आ. श्वेताताई महाले यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर या ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळले असून, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, मंगरूळ, अमोना यासह मुरादपूर, बेराळा, भालगाव, कोलारा, मलगी व आसपासची गावे मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याने एकमेकांना जोडण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे या गावांचे दळणवळण वाढणार असल्याने या गावांची प्रगती होणार आहे. आतापर्यंत सिंदखेडराजा लोकप्रतिनिधींना जे शक्य झाले नाही ते चिखलीच्या लोकप्रतिनिधींनी तालुका हा घटक गृहीत धरून या गावांसाठी केले आहे. गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच हे लोकोपयोगी रस्ते ग्रामीण रस्त्यांत दर्जोन्नत झालेले आहेत.
– राज्य शासनाचा सविस्तर निर्णय वाचा –