Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

शिवसेना-वंचित आघाडीच्या युतीची उद्या घोषणा शक्य!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – ‘युतीचं अजून काही ठरलं नाही, आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतोय’, असे खोचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर, आज शिवसेनेकडून वंचितसोबत युतीसंदर्भात वेगवान घडामोडी घडल्या आहेत. उद्या, दि.२३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. उद्याच या नव्या युतीसंदर्भात घोषणा होईल, अशी माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळे ठरले आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे, असे देसाई यांनी सांगितले. तर माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचे ते नंतर पाहू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेले होते. परंतु आम्ही त्यांना नाकारलेले नाही, आम्ही केवळ दलितांपुरत मर्यादित राहावे अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नसल्याचे आंबेडकर यांनी सांगून, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत जाण्यास त्यांनी अनुकुलता दर्शविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर बोलताना वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतले पाहिजे असे मत मांडले होते. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीसोबतही जायला तयार आहोत. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारले आहे. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, कोणत्याहीक्षणी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असून, या युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने दानवे यांनी सांगितले.


देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील, त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून राहण्यात कमीपणा वाटतो!

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे कमीपणा वाटते. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करतील. यासाठी ते राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील. कदाचित वंचितला घेऊ नका म्हणून प्रयत्न करतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळे लढावे, असा प्रयत्न करतील. ज्यांच्या चौकशी सुरु आहे तिथून प्रयत्न करतील. त्यामुळे मला वंचित आणि शिवसेना हीच युती जास्त सोयीचे वाटते. काँग्रेसमध्ये धमक राहिलेली नाही. मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही. पण, ब्लॅक लिस्ट मधून बाहेर आली. म्हणून अल्टर्नेटीव्ह Front उभे करावे आणि त्यांना विचारावे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी कोकण सोडून इतर चार मतदार संघात निवडणूक लढणार आहे. अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रावर शैक्षणिक धोरण लादत असल्याची टीका यावेळी आंबेडकर यांनी केली.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!