– १७ एपीआय, २५ पीएसआय यांच्या बदल्यांचा मेमो जारी!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी पोलिस दलात व्यापक खांदेपालट केला असून, तब्बल ४२ अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांत १७ सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. साखरखेर्डाचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून बसवले गेले असून, त्यांच्या कार्यकाळात साखरखेर्डा पोलिस ठाणेहद्दीतील गुन्ह्यांना आळा बसला होता. तसेच, त्यांनी सामाजिक बांधिलकीतून पोलिस व जनता यांच्यात चांगला समन्वयदेखील निर्माण केला होता. आंडोळे यांच्या जागी आता एसपींचे वाचक असलेले नंदकिशोर काळे हे आले आहेत. बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांना बिबी येथे पाठविण्यात आले असून, बीबीचे ठाणेदार लहू तावरे यांची मलकापूर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा आस्थापनाची बैठक झाली होती. त्या बैठकीत बदल्यांचा मेमो फायनल करण्यात आला होता. आपल्या बदलीची चाहूल लागताच अनेकांनी कालपासून बदली रद्द करण्यासाठी फिल्डिंगही लावली होती. परंतु, आज मेमो जारी झाल्यानंतर बदल्या झाल्याच असल्याचे या अधिकार्यांच्या लक्षात आले. प्रमुख बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत चमकदार कामगिरी करणारे एपीआय अशोक जायभाये यांची मेहकर पोलिस ठाण्यात बदली असून, एपीआय स्मीता म्हसाये यांची मलकापूरमधून नांदुरा पोलिस ठाण्यात, कमलेश खंडारे यांची शेगाव शहर पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, सुनील सोळंके यांची आर्थिक गुन्हे शाखेतून सायबर क्राईम शाखेत, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या एपीआय सविता मोरे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून, मेहकर पोलिस ठाण्यातील एपीआय नंदकुमार अहिरे यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्जशाखेत बदली झालेली आहे. पीएसआय विश्वजीत ठाकूर (मलकापूर पोलिस ठाणे) यांची नियंत्रण कक्षात बदली झाली असून, पीएसआय विजय हुडेकर यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखेत बदली झाली आहे. तर पीएसआय स्वप्नील रणखांब यांची नियंत्रण कक्षातून नांदुरा पोलिस ठाण्यात बदली झाली असून, साखरखेर्डातील पीएसआय सचिन कानडे यांची एलसीबीत बदली झाली आहे.
——————–