BULDHANAChikhaliHead linesMaharashtraNagpurVidharbha

‘वैनगंगा ते नळगंगा’ या नदीजोड प्रकल्पास ‘पैनगंगा’ प्रकल्प जोडणार!

– बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील दुष्काळ हटविण्यासाठी ऐतिहासिक पाऊल!

नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार्‍या भविष्यातील विदर्भाची जीवन रेषा ठरणार्‍या ‘ वैनगंगा ते नळगंगा’ या नदीजोड प्रकल्पास ‘पैनगंगा नदी ‘ प्रकल्प जोडून या वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पापासून वंचित असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील घाट माथ्यावरील असलेल्या दुष्काळी भागालासुद्धा पाणी देणार असल्याची अतिशय महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना केल्याने भविष्यातील संपूर्ण बुलढाणा जिल्हा सुजलाम सुफलाम होण्याचे संकेत प्राप्त झालेले आहे.

प्रस्तावीत असलेल्या ‘वैनगंगा ते नळगंगा’ या नदीजोड प्रकल्पाचा मूळ आराखडा हा ‘वैनगंगा ते नळगंगा’ असा आहे. त्या आराखड्यात पैनगंगा प्रकल्पाचा सामावेश झालेला नव्हता. या प्रकल्पात पैनगंगा नदीजोड आणि मन नदीजोड प्रकल्पाचा सामावेश करून बुलडाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात या प्रकल्पाचे पाणी नेण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. परंतु, मागील महाआघाडी सरकारने या अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाला थंडबस्त्यात टाकलेले होते. परंतु, आता युतीचे सरकार आल्याने मूळ प्रकल्पाला तर गती आलीच परंतु आता या ‘वैनगंगा ते नळगंगा’ या नदीजोड प्रकल्पात ‘पैनगंगा, मन’ प्रकल्प जोडणार, अशी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाना फार मोठे यश आल्याने बुलढाणा जिल्ह्यासोबतच वाशिम आणि इतर जिल्ह्यांनासुद्धा या नदी जोड प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.


संपूर्ण विदर्भाला नवसंजीवनी देणारा प्रकल्प; ५ लाख ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!
‘वैनगंगा ते नळगंगा’ हा प्रकल्प आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या लक्ष्यवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा ‘वैनगंगा ते नळगंगा’ प्रकल्प हा अतिशय महत्वाचा प्रकल्प असून, ते मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ४२६ किलोमीटरचा बोगदा खोदल्या जाणार आहे. खोदल्या जाणारा हा बोगदा भारतातील माहीत नाही पण महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा असणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील पाच लाख ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी ८२ हजार कोटी खर्च येणार आहे. हा निधी केंद्राने दिला नाही तर महाराष्ट्र सरकार हा निधी उभारून विदर्भातील दुष्काळी भागाचा प्रश्न त्यामुळे सोडवणार आहे.


आत्महत्याग्रस्त भागाला फायदा होऊन आत्महत्या होणार नाही!

सिंचनाच्या व्यवस्था नसल्यामुळेच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. सततची नापिकी तसेच शेतीसाठी सिंचनासाठी पाणी नसणे हे विदर्भातील शेतकरी आत्महत्याची कारणे आहेत. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीचा प्रकल्प झाल्याने संपूर्ण विदर्भतील दुष्काळी भागाला या नदीजोड प्रकल्पाचा फायदा होणार असल्याने हा भूभाग सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांना समृद्धीची वाट दिसणार आहे यामुळेच भविष्यात विदर्भात आत्महत्या होणार नाही.


परभणी, हिंगोलीपर्यंत हे पाणी देणार!
मूळ आराखड्यानुसार असलेल्या वैनगंगा नळगंगा या प्रकल्पाला पैनगंगा व मन प्रकल्प जोडून हे पाणी फक्त विदर्भालाच नव्हे तर परभणी हिंगोलीपर्यंत नेणार असल्याचा मानसदेखील फडणवीस यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या लक्ष्यवेधीला उत्तर देताना व्यक्त केल्याने, विदर्भात सोबतच मराठवाड्यातील दुष्काळी व आत्महत्याग्रस्त असलेल्या भागांना प्रकल्पाचा फायदा होणार आहे. विदर्भातील दुष्काळी व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाला वरदान ठरणार्‍या हा प्रकल्प रखडून राहू नये, यासाठी या प्रकल्पाचा कालबद्ध कार्यक्रम आखून हा प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा नॅशनल वाटर डेव्हलपमेंट एजन्सीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्प अहवालानुसार, वैनगंगा नदीचे अतिरिक्त पुराचे पाणी, नागपूर-वर्धा अमरावती-अकोला-नळगंगा (ता.मोताळा जि.बुलडाणा) या मार्गावरील कमीत कमी ४० धरण साठ्यात आपआपल्या कॅचमेट एरियाला सरप्लस म्हणून, पाणी उपलब्ध करून येण्याची ही योजना आहे. ज्याव्दारे एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तरीही, जलसाठे १०० टक्के पूर्ण क्षमतेणे भरलेले असेल. परंतु असे असले तरीही विदर्भातील या एकमेव नदीजोड प्रकल्पातून शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील ४० टक्केच भूभागाला फायदा होणार आहे. प्रकर्षाने आवश्यक असलेल्या घाटमाथ्यावरील बुलडाणा-वाशीम यवतमाळ-चंद्रपूर इत्यादी चा ६० टक्के भूभाग या प्रकल्पापासून वंचित राहणार होता. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ही वास्तव उणीव भरून काढण्याकरिता, या नदीजोड प्रकल्पामध्ये खामगाव ते घाटमाथ्यावरील मन व पैनगंगा नदी पुन्हा जीवित करण्यासाठी ४७ किलोमीटरचा प्रकल्पाचा विस्तार करण्याची आवश्यकता होती. ही आवश्यकताच आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून दिली आणि सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने घाटमाथ्यावरील बुलढाणा जिल्हा आणि उर्वाfरत मूळ आराखडातील प्रकल्पापासून वंचित राहिलेल्या विदर्भातील ६० टक्के भागांना होणार आहे.


प्रकल्पासाठी लागणारे भूसंपादन नवीन कायद्यानुसार!

पैनगंगा, नळगंगा या नदीजोड प्रकल्पासाठी करण्यात येणारे भूसंपादन हे समृद्धी महामार्गाच्या साठी करण्यात आलेल्या भूसंपादनाप्रमाणे पाचपट दराने करावे, अशी मागणी या लक्ष्यवेधीच्या चर्चेत सहभागी होताना माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केली असता, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी कमीत कमी जमीन भूसंपादन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु जी काही जमीन संपादन करण्यात येणार असेल ती भूसंपादनाच्या नवीन कायद्याप्रमाणेच होईल, असे आश्वासन देखील त्यांनी सभागृहाला यावेळी दिले. या लक्ष्यवेधी चर्चेत आ. संजय रायमुलकर, आ. दादाराव केचे, आ. हरीश पिंपळे हेदेखील सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!