Breaking newsHead linesMaharashtraPachhim Maharashtra

ऐनदिवाळीत महसूलमंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर!

– शेतीपिकांच्या नुकसानीची केली पाहणी
– ई-पीक नोंदणीच्या अटी शिथिल करणार, मदतीचे क्षेत्र तीन हेक्टरपर्यंत करणार

शेवगाव (बाळासाहेब खेडेकर) – पावसाने धुमाकूळ घातल्याने शेवगाव तालुक्यात सर्वाधिक साठ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी व इतर विविध पिके बाधित झाली आहेत. कपाशीचे क्षेत्र मोठे असून, शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, येत्या आठ दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधिताना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. अडचणीत सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ऐन दिवाळीत महसूलमंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, लाड जळगाव, बालमटाकळी आदी भागात मंत्री विखे यांनी आज दौरा करून परतीच्या पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकर्‍यांना धीर दिला. संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नपूर्वक काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली, यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दुपटीने नोंद झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात जवळपास ९० टक्के नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यात कपाशीचा पेरा जास्त आहे. तालुक्यातील ४१ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभागी होऊन जवळपास २० लाख रुपयांचा पीकविमा उतरविला आहे. पीक विम्याचे स्वरक्षित क्षेत्र २१ हजार हेक्टर च्या आसपास असून, शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला कळविण्याची जाचक अट शेतकर्‍यांसाठी अडचणीची ठरली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यात अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने ई-पीक नोंदी घेण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने मर्यादित वेळेची, ई-पीक पहाणीची जाचक अट प्रसंगी शिथिल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांना मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्याचा तसेच जिरायत, बागायत क्षेत्र बरोबर फळ बागांच्या नुकसानीची मदत निधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नुकसानग्रस्त शेतकरी मदतनिधी पासून वंचित राहणार नाही, असा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री विखे यांनी दिली.
मंत्री विखे यांनी बोधेगाव येथील गिरीअप्पा महाराज, सुरेश दातीर, लाडजळगाव येथील विठ्ठल घाडगे, शिवकुमार मानूरकर, शिवाजी मस्के, आदी शेतकर्‍यांच्या शेतबांधवर जाऊन झालेल्या कपाशीची नुकसानीची पाहणी केली. या दौर्‍यात भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, तुषार वैद्य, कचरू चोथे, बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, गणेश ढाकणे, पांडुरंग तहकीक, काकासाहेब तहकीक, दत्ता तहकीक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार छगन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी शेतकरी उपस्थित होते.


महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे बोधेगाव येथे बन्नोमाँ दर्ग्याच्या जवळ आले असताना कॉम्रेड संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के, धोंडिबा मासळकर, बनेमिया शेख, संगीता ढवळे यांनी काळे कपडे परिधान करून नुकसानीच्या पाहणीचा फार्स न करता झालेल्या नुकसानीची सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करून जोरदार घोषणाबाजी करून लक्ष वेधले. यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने या आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतले व अटक केली. नंतर चौकशीअंती सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!