BULDHANAChikhaliVidharbha

हरभरा खरेदी करणार्‍या व्यापार्‍याने १६ शेतकर्‍यांना ३० लाखांनी गंडविले!

– मेहकर तालुक्यातील वीरसावंगीचा आडत्या पैसे बुडवून पळून गेला

मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – गेल्या काही महिन्यापूर्वी असोला येथील सोयाबीन व्यापारी परिसरातील शेकडो शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांनी गंडवून फरार झालेला आहे, त्याच बरोबर आता हरबरा मालाचा जास्तीचा मोबदला देतो असे म्हणून १६ शेतकर्‍यांची ३० लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांपैकी प्रभाकर संपत हूसे रा. डिग्रस बुद्रूक यांच्या तक्रारी वरून अंढेरा पोलिसांनी आरोपी प्रताप श्रीराम बोरूडे (आडत्या) वय ४५ वर्षे रा. वीरसांवगी ता. मेहकर याच्याविरुध्द २३ सप्टेंबररोजी विविध कलमांद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बोरूडे हा फरार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

सविस्तर असे, की गेल्या काही महिन्यांपूर्वी असोला येथील वहिद खान दिलावर खान या सोयाबीन व्यापार्‍याने अंत्री खेडेकर, मेरा खुर्द, असोला, देऊळगाव घुबे येथील शेकडो शेतकर्‍यांकडून वाढीव रकमेचे आमिष दाखवून चार कोटी रुपयांचा सोयाबीन माल खरेदी करुन फरार झाला. हा व्यापारी अजूनदेखील सापडला नाही. त्याच बरोबर आता शेतकरी प्रभाकर संपत हूसे रा. डिग्रस बु यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, दि. २२ जुलै २०२१ रोजी माझा हरभरा वजन ३० क्विंटल ५५ किलो प्रती भाव ५१०० रुपये प्रमाणे एकूण रुपये १ लाख ४५ हजार २०० चा माल आरोपी नामे प्रताप श्रीराम बोरुडे रा. वीरसावंगी ता. मेहकर यांना दिला व त्यांनी दि २२ जुलै २०२१ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा चेक दिला. आणि सांगितले की सदरचा चेक हा तुम्ही दोन महिन्यानंतर बँक मध्ये जमा करा. ठरलेल्या कराराप्रमाणे दिलेला चेक दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी चिखली अर्बन बँक शाखा देऊळगावमही येथे जमा केला होता. परंतु व्यापार्‍याच्या खात्यात पैसे जमा नसल्याने सदरचा चेक बाऊन्स झाला. त्यामुळे व्यापार्‍याला मोबाइल फोन करून सांगितले की, तुम्ही दिलेला चेक बाऊन्स झाला आहे. तुम्ही मला माझे मालाचे पैसे कधी देणार, याबाबत विचारणा केली असता, व्यापार्‍याने उडवाउडवीचे उत्तर दिली आणि काही दिवसानंतर मोबाइल फोन बंद करून टाकला. त्यामुळे आपली फसवणूक केली असे समजले.

हा प्रकार गावात माहीत होताच गावांतील अनेकजण समोर आले आणि आपली फसवणूक झाली नाही ना असे म्हणून त्यांनी व्यापार्‍याला फोन लावला असता, फोन बंद असून गावातून पसार झाल्याचे समजले. त्यामुळे या व्यापार्‍याने गावातील आणखी १६ शेतकर्‍यांकडून ५८० क्विंटल ५८ किलो रुपये २९ लाख ४६ हजार ७९६ रुपयांचा हरभरा माल विकत घेवून त्याचेसुध्दा चेक बाऊन्स झाल्याने सर्वांनी पोलीस स्टेशनला धाव घेवून फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी प्रभाकर संपत हूसे रा डीग्रस बु यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली. अशा तक्रारी वरून ठाणेदार हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अमलदार यांनी २३ सप्टेंबर रोजी आरोपी प्रताप श्रीराम बोरूडे (आडत्या) वय ४५ वर्षे रा.वीरसांवगी ता. मेहकर याच्या विरूध्द कलम ४०६ ,४०९ ,४२०, भादंविनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, कैलास उगले, खारडे, शिरसाट , गजानन वाघ, मोरर्शिंग राठोड, सुरेश गवई, विलास काकड, पोफळे, समाधान झीने, सोनकांबळे यांनी तपास हाती घेतला आहे. फरार झालेल्या आडत्याचा कसून शोध घेतला जात आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!