शेतकरी सभासदांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – विठ्ठल कारखान्याच्या निवडणूकीसाठी मत टाकायला जाताना प्रत्येक सभासद शेतकर्याने छातीवर हात ठेवून हा विचार करावा, की बंद पडलेला विठ्ठल कारखाना कोण चालवू शकतो, कारखाना चालवणारा माणसांला आपले मत द्यावे, अशी विनंती शेतकरी नेते अभिजित पाटील यांनी उपस्थित सभासद शेतकर्यांना करत, काहीही झालं कोणतीही अडचण आली तरी विठ्ठल परिवारातल्या कोणत्याही माणसाला उघडं पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. थकीत बिले दिल्याशिवाय मोळी टाकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी सत्ताधार्यांना दिला.
विठ्ठल कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कोर्टी, भंडीगाव येथील बैठकीत अभिजित पाटील यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. विठ्ठल कारखान्याच्या बंदच्या काळात आपण विठ्ठलच्या सभासद ६ हजार शेतकर्यांचा ऊस गाळप केला. मात्र आता मतासाठी गावोगावी फिरणार्या सत्ताधारी गटाने किती शेतकर्यांना मदत केली ते सांगावे? शेतकर्यांना मदत करण्याच्या वेळी तुम्ही नॉट रीचेबल असता आणि आता मते मागताना आपल्या वडील आणि आजोबांचा वारसा सांगत फिरता, हा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा घणाघाती आरोपही त्यांनी सत्ताधारी गटाचे नाव न घेता पाटील यांनी केला.