Breaking newsChikhaliHead linesVidharbha

शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी उपासले अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार!

– शेतकरी संघटनांसह विविध संघटना, कार्यकर्ते यांचा पाठिंबा; आंदोलन पेटणार!
– मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडणार नाही; सरनाईक यांनी ठणकावले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – गेल्या वर्षीचा प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई तसेच भक्ती महामार्ग रद्द करा, तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी, यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास दि. ५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. जोपर्यंत राज्य सरकार शेतकरीहिताच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्ते शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी जाहीर केली आहे.

गेल्यावर्षी अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने खरीप व रब्बी हंगामात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. नवीन खरीप हंगाम आला तरीसुद्धा पीकविमा कंपनी अजून पीकविमा देण्यास तयार नाही, ज्यांना दिला त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम दिली तर चिखली तालुक्यातील रब्बीतील ८ हजार तर खरीपमधील हजारो शेतकर्‍यांना विविध कारणे दाखवत अपात्र केले आहे. एकीकडे नुकसान भरपाई शासन देत आहे. परंतु दुसरीकडे मात्र ७२ तासांत तक्रार न केलेल्यांना पीकविमा देण्यास कंपनी टाळटाळ करीत असल्याने सरसकट १०० टक्के पीकविमा रक्कम देण्यात यावी, ऑनलाइन प्रणालीमुळे ई-केवायसी करूनसुद्धा हरभर्‍याची नुकसान भरपाई अडकून पडली आहे. त्यामुळे तातडीने पीकविमा व नुकसान भरपाई देण्याची मागणी सरनाईक व राजपूत यांनी केली आहे.
शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची व मागील रखडलेले ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पीएम-किसान व सीएम-किसान योजनेच्या वंचित शेतकर्‍यांचे हप्ते देण्यात यावे, तर दुसरीकडे भक्ती महामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असतांना भक्ती महामार्ग करण्याचा घाट का घातला जात आहे? शेतकर्‍यांना नोटीस दिल्या जात असल्याने सरनाईक, राजपूत यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले असून तातडीने भक्ती महामार्ग रद्दबाबत अमलबजावणी करून आदेश पारित करण्यात यावा, अशी मागणी सरनाईक, राजपूत यांनी केली आहे. त्यासोबत चिखली तालुक्यात रोजगार हमी योजनेचे विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचाराची जलगतीने चौकशी करून तातडीने रखडलेल्या विहीर, गोठे, घरकुलाचे प्रस्ताव मंजूर करण्यार यावे, तसेच चिखली शहरालगतची १६ गावे महावितरणे उंद्री (उदयनगर) विभागात समाविष्ट केल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. गावांचे सरपंच व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही महावितरण कार्यवाही करत नाही, त्यामुळे तातडीने ही १६ गावे पूर्वीप्रमाणे चिखली विभागात समाविष्ट करण्यात यावी. तर कामगार कल्याणच्या माध्यमातून राबविलेल्या जाणार्‍या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, कामगारांची मोठी आर्थिक लूट होत आहे. इतर तालुक्यात संसार किट वाटप झालेल्या असतांना चिखली तालुक्यात मात्र कामगार कल्याणच्या व संबंधित संस्थेच्या वेळ काढू धोरणामुळे अनेक कामगारांची नूतनीकरण तारीख संपली आहे व नूतनीकरणासाठी वेळ लागत असल्याने हजारो कामगार योजनेपासून वंचित राहणार. त्यामुळे तातडीने वंचित कामगारांना योजनेचे लाभ देण्यात यावा, भ्रष्ट व दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्यासह गजानन कुटे, रविराज टाले, अरुण नेमाने, अरुण पन्हाळकर, नवलसिंग मोरे, गणेश देशमुख, भारत गाढवे, विनोद नरवाडे, पुंडलीक रोडगे, विठ्ठल दलसिंग परिहार, प्रकाश घुबे, सखाराम सोरमारे, सुदर्शन पवार, दिलीप मोळवंडे, संतोष रोडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
———–
शेतकरी संघटनेचा आंदोलनास पाठिंबा!
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास शेतकरी संघटनेचे देविदास कणखर, समाधान कणखर, मुरलीधर येवले, प्रकाश घुबे यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे, तर मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!