BULDHANAVidharbha

बुलढाण्यात महायुती सरकारचा चिखलफेक करत पुतळा जाळला!

– काँग्रेसचे जोरदार आंदोलन, जयस्तंभ चौक दणाणला!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील महायुती व केंद्रातील एनडीए सरकारच्या काळात जातीधर्माच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघवण्याचा प्रयत्न सुरूच असून, राज्यातील महायुती सरकार जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करत जिल्हा काँग्रेसच्यावतीने स्थानिक जयस्तंभ चौकात काल, दि.२१ जूनरोजी चिखलफेक आंदोलन करत, राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्य सरकार सत्तेच्या मस्तीत धुंद असून, जनतेच्या समस्येशी त्यांना काही सोयरसुतक नाही, असा आरोप करत येत्या निवडणुकीत जनताच त्यांना चिखल फासल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी यावेळी केला.

राज्यातील जनता विविध समस्यांशी दोनहात करीत असून, महाभ्रष्ट महायुती सरकार जनतेच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. महायुती व एनडीए सरकारच्या कार्यकाळात महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देऊन जातीधर्माच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. विविध स्पर्धा परीक्षा तसेच नोकरभरतीच्या परीक्षेमध्ये या सरकारच्या काळात सावळा गोंधळ सुरू त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. एकंदरीत जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना सरकारला मात्र त्याचे काहीही देणेघेणे नाही, त्याचा निषेध करण्यासाठी काल, दि.२१ जूनरोजी स्थानिक जयस्तंभ स्तम चौकात चिखल फासत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात आ. धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, सचिव संजय राठोड, किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रांगण खंडारे, सेवादलाचे तेजेंद्रसिंग चव्हाण, संतोष आंबेकर, शैलेश खेडकर, प्रकाश पाटील, शैलेश सावजी, दीपक रिंढे, तुळशीराम नाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!