Breaking newsHead linesMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान

– मुंबईत कडेकोट बंदोबस्त; उद्धव ठाकरेंसाठी महाआघाडी एकवटली!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबल्यानंतर आज दिवसभर उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी व सोशल मीडियावरील प्रचाराचा जोर लावला होता. उद्या (दि.२०) मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांकरिता मतदान होणार असून, उत्तरप्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनऊसह महत्वाच्या लढतींसाठीही उद्याच मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा उद्या शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईत ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. प्रचार थांबण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडले होते. कारण, शेवटच्या टप्प्यातील मतदान हे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. मुंबईतील सहा जागांवर महाआघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आहे. महाराष्ट्रासह बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांतदेखील उद्या मतदान आहे. ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी या मतदारसंघात चुरशीच्या लढती आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

मुंबईतील काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनीही मुंबईकरांसाठी विशेष ट्विट केलंय. सोमवार हा मतदानाचा दिवस आहे, मुंबईकरांनो घराबाहेर पडून मतदानाचा हक्क आणि जबाबदारी निभावा, असे आवाहन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांच्या ट्विटला 45 हजार लाईक्स मिळाले असून 9 लाख 23 हजार जणांनी हे ट्विट पाहिल्यांचं दिसून येतेय. तर, 4.9 हजार युजर्संने हे ट्विट रिट्विट केलंय. तर, बातमी लिहीपर्यंत 994 कमेंट त्यांच्या ट्विटवर पडल्या आहेत.


पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३९७  उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखलराज्यातील १३ जागांसाठी होणार मतदान
मुंबईतील ६ जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरूद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून दोन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित ४ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोनहात करणार आहेत. महायुतीमध्ये तीन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्ग ठोकला आहे.

– मुंबईतील प्रमुख लढती –
– दक्षिण मुंबई – अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव – शिवसेना विरुद्ध शिवसेना
– दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई – शिवसेना विरुद्ध शिवसेना
– उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील – भाजप विरुद्ध काँग्रेस
– उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड – भाजप विरुद्ध काँग्रेस
– उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील – भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना
– वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर – शिवसेना विरुद्ध शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!