– अनेक रस्ते, महामार्ग बंद, प्रवासी खोळंबले
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – अमरावती जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवला असून, नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे शेती वाहून गेल्या असून, रस्ते ठप्प पडले आहेत. परिणामी, अनेक प्रवासी खोळंबलेले आहेत. पिकांसह शेती खरडून गेल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
काल काल रात्रीपासून मेळघाट परिसरातील काही भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मेळघाटातील दुर्गम भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. नदीकाठातील शेती वाहून गेली. आंबापाटी येथील एका शेतकर्याचे दोन एकर शेती खरडून गेली, तर शेताला नदीचे स्वरूप आले. तसेच गिरगुटी येथील पुलाचे काम चालू असल्यामुळे रस्ता दुसरीकडून काढला होता तो काढलेला रस्ता पूर्णता वाहून गेल्यामुळे परतवाडा ते टेंभ्रुसोंडा मार्गे धारणीकडे जाणारा हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. या ठिकाणची वाहतूक बंद झाली, तसेच आंबा पाटीजवळील पूलसुद्धा आजूबाजूने खचल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबापाटी, ढाकणा परिसरातील वीस पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे. आंबापाटी गावातील शेषराव सुरजेकर, धारासिंग पवार, बजरंग पवार, बलदेव पवार, फुलचंद जामुनकर या शेतकर्यांची शेती पावसामुळे खरडून गेली. त्यामुळे या शेतकर्यांचे मोठं नुकसान झालेले आहे. रात्री बारा वाजेपासून तर आज दुपारी दोन वाजेपर्यंत सतत पाऊस सुरू असल्याने चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी, गिरगुटी या परिसरातील २५ गावांना पावसाचा फटका बसला आहे. या शिवाय, प्रमुख महामार्गावरही पाणी साचले असून, प्रमुख नद्या दुथडी भरून वाहात आहेत. काही नद्यांना महापूर आले असून, खेडोपाडी वीजपुरवठा ठप्प झालेला आहे.
———————
Leave a Reply