सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जल जीवन मिशनचे चारवेळा टेंडर झाले असताना री-कॉल करणे, नियमबाह्य टेडरचे वाटप करणे, वर्क ऑर्डर चार महिने झाले तरी न देणे, असे काम सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात सुरू असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप सोपल यांनी नाव न घेता केला.
सोलापूर जिल्हा परिषद येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता माजी आमदार सोपल हे आले होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांची भेट घेतली. जलजीवन मिशनच्या होत असलेल्या कामाबाबत जाब विचारण्यासाठी आले असल्याची माहिती या प्रसंगी माध्यमांना सोपल यांनी दिली. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना सोपल म्हणाले की, आम्ही आमदार असताना अशा किरकोळ गोष्टींमध्ये कधीही लक्ष दिलेले नाही. परंतु आज जलजीवन मिशनचे काम असो की, जिल्हा परिषद येथील दलित वस्तीचे काम असो, या ठिकाणीदेखील जाणून-बुजून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद येथील अधिकारी हे कोणाच्यातरी दबावाखाली काम करीत आहेत. वास्तविक पाहता, जल जीवन मिशनचे जे काम सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे याबाबत कोणत्याही प्रकारचा सर्वे करण्यात आलेला आहे. शिवाय, गावाची सद्यस्थितीदेखील जाणून न घेता केवळ काम करून बिले काढली जात असल्याचेही याप्रसंगी सोपल यांनी सांगितले.
—————