आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वारकरी संप्रदायाची व संतांच्या समाधी स्थळांची माहिती व्हावी तसेच संत विचारांचा प्रसार करण्यासाठी ( चारधाम , बाराज्योतिर्लिंग यात्रा प्रमाणे ) संत धाम यात्रा सर्वानी करावी यासाठी जनजागृती करण्यासाठी वारकरी सेवा संघाचे वतीने ह. भ. प. संजय बोरगे यांनी दुचाकी वरून ( हिमालयन ) संत धाम यात्रेस आळंदीतुन प्रारंभ हरिनाम गजरात प्रारंभ केला.
यावेळी आळंदी देवस्थानचे चोपदार राजाभाऊ रंधवे, पालखी सोहळयाचे मालक बाळासाहेब आरफळकर, वेदमूर्ती आनंद जोशी, विश्वम्भर पाटील, नरहरी महाराज चौधरी, व्यसनमुक्ती युवक सेवा संघाचे सचिन शिंदे यांचेसह आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माउली मंदिरात श्रींचे दर्शन घेत वेदमूर्ती आनंद जोशी यांनी वेदमंत्र जयघोष करीत पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते संत धाम यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी यात्रेच्या उपक्रमाची माहिती देत मार्गदर्शन करून यात्रेच्या उपक्रमास आळंदीतून निरोप दिला. संजय बोरगे यांनी सर्व संतांच्या समाधी स्थळांची परिक्रमा करण्याचा संकल्प केला असून यास आळंदीतून सुरुवात झाली.
परिक्रमा मार्गात सुरुवात आळंदी येथून झाली असून पुढे देहू मार्गे, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, पैठण, आपेगाव, नेवासा, आळे, अरण, तेर, मंगळवेढा, पंढरपूर, सासवड, या क्षेत्रांचा सुमारे २००० किलो मीटरचा प्रवास यात्रेत होणार आहे. यात्रेत माधुकरी मागून भोजन, मंदिरं विश्रांती मुक्काम, प्रवचन करीत संत धाम यात्रा पूर्ण केली जाणार असल्याचे बोरगे महाराज यांनी सांगितले. या संकल्पनेचे आळंदी पंचक्रोशीसह समस्त वारकरी संप्रदायाचे वतीने स्वागत करण्यात आळे आहे. आळंदी या उपक्रमाचे राजाभाऊ रंधवे चोपदार यांनी स्वागत करून कौतुक केले.