Breaking newsBuldanaBULDHANAMaharashtraVidharbha

शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी अजितदादा मैदानात; रविकांत तुपकरांनी उपोषण सोडले!

– राज्य सरकारचे तुपकरांना बैठकीचे निमंत्रण; उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ११ सप्टेंबरला बैठक
– पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मध्यस्थी
– तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन, उद्याचा रास्तारोकही तूर्त स्थगित ; शेतकरी महिलेच्याहस्ते सोडले उपोषण
– ११ सप्टेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबरपासून आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार – रविकांत तुपकर

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीची १०० टक्के नुकसान भरपाई, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबररोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. ना.पवार व संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलाविले आहे, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती शेतकरी व सहकार्‍यांनी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित महिलांच्याहस्ते व माँसाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले. बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू, जर ठोस निर्णय झाले नाही तर राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले. दरम्यान खास सूत्रांच्या माहितीनुसार, आज तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्याचा बीपी कमालीचा घसरला होता. ते कोणत्याहीक्षणी कोमात जाण्याची शक्यता होती. मूत्रपिंडदेखील निकामी होण्याची भीती होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचविण्यासाठी राज्य सरकार सक्तीने त्यांना रूग्णालयात नेण्याचीही शक्यता होती. परंतु, तुपकरांच्या सामंजस्याच्या पावलामुळे पुढील अनेक दुर्देवी प्रसंग टळले आहेत.

मातृतीर्थ सिंदखेड राजात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन गेल्या चार दिवसांपासून सुरू होते. सोयाबीन – कापसाची दरवाढ, पीकविम्याचा प्रश्न, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी, जंगली जनावरांपासून शेतीपिकांचे रक्षण यासह विविध मुद्यांवर तुपकरांनी हे आंदोलन सुरू होते. आज, दि. ७ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातल्या शेकडो गावात व राज्यातील हजारो गावांत तुपकर यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायतचे ठराव घेण्यात आले. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून, शासनाने शेतकर्‍यांच्या हिताच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे ठराव विविध ग्रामपंचायतीने घेतले आहेत. तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली असतांनाही सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. ८ सप्टेंबररोजी रास्तारोको आंदोलन असल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, आज सायंकाळी शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आंदोलनाची दखल घेतली असून, शेतकर्‍यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांनी रविकांत तुपकर यांना ११ सप्टेंबररोजी मुंबई येथे बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीचे लेखी निमंत्रण जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी खडसे यांनी रविकांत तुपकर यांना दिले. शासनाच्यावतीने शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली हे आंदोलनाचे आणि शेतकर्‍यांच्या एकजुटीचे यश आहे. केवळ आंदोलन करणे आणि कायदा हाती घेणे हा आपला उद्देश नसून, शेतकर्‍यांच्या पदरात त्यांच्या न्याय हक्क मिळवून देणे हा आपला उद्देश असल्याने आपण उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून आपल्या आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. जिजाऊंच्या या पावनभूमीत आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या कमलबाई डोईफोडे, मीनाताई डोईफोडे या माऊलींच्याहस्ते तुपकरांनी आपले अन्यत्याग आंदोलन तोडले. ११ सप्टेंबररोजी उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत काय निर्णय होतात आणि कोणत्या कोणत्या मागण्या मार्गी लागतात हे पाहूनच पुढील निर्णय घेऊ, तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी आणि शेतकर्‍यांनी शांत रहावे, जर ठोस निर्णय झाले नाही तर आक्रमकपणे रस्त्यावर उतरू असे, रविकांत तुपकर यांनी सांगितले.


आ.डॉ.राजेंद्र शिंगणेंसह विविध नेत्यांच्या आंदोलनस्थळी भेटी

राज्याचे माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. मागण्या समजून घेतल्या, रविकांत तुपकर हे राज्यातील शेतकर्‍यांचा आवाज आहे, त्यामुळे त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्लादेखील आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला. तसेच माजी आमदार तोताराम कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबुब शेख, प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके, ज्योतीताई खेडेकर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, प्रा.नरेश बोडखे, कु.गायत्री शिंगणे, स्वातीताई नखाते यांनी आंदोलनस्थळी पोहोचून रविकांत तुपकर यांची भेट घेतली.


तुपकरांच्या बिघडलेल्या प्रकृतीने सरकार चिंतेत पडले!

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची तब्येत चौथ्या दिवशी प्रचंड बिघडली होती. त्यांना कोणत्याही परिस्थितीत रूग्णालयात दाखल करणे व सलाईन लावणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शहीद होण्याची भाषा तुपकर हे करत होते. खास सूत्रांच्या माहितीनुसार, तुपकरांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर एक यंत्रणा तुपकरांना सक्तीने रूग्णालयात दाखल करण्यासाठी काम करत होती. तर असे केले तर कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती निर्माण होईल, याचाही आढावा घेतला जात होता. त्यादृष्टीने आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. परंतु, सक्तीने तुपकरांना रूग्णालयात दाखल केले तर आंदोलन चिघळेल व घटनास्थळी मोठी गर्दी आहे, त्यातून अंतरवली सराटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका सरकारला आल्याने सरकारने तुपकरांशी चर्चेचा मार्ग अवलंबविला. तुपकरांना रक्तदाब (बीपी) प्रचंड खालावला होता, त्यांचे मूत्रपिंड निकामी होण्याची भीती होती, ते कोणत्याहीक्षणी कोमात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे तुपकरांच्या नजीकच्या लोकांनीदेखील चर्चेतून मागण्या मार्गी लागत असेल तर थोडं थांबून उपचार घ्या, जीव महत्वाचा आहे. जगलो वाचलो तर शेतकर्‍यांसाठी यापेक्षा मोठा लढा उभारू, असे तुपकरांना समजावून सांगितले. त्यामुळे सरकारचा आग्रह, निकटवर्तीयांची आग्रही विनंती यामुळे तुपकरांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच, कायदा हातात घेऊन केले जाणारे उद्याचे आंदोलनही स्थगित केले होते.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!