– मेहकर हादरले; झोपेत पत्नी आणि चार वर्षांच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार!
मेहकर/ बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चारित्र्यावर संशय… संशयातून विकृती… आणि त्या विकृतीतून थेट नरसंहार! मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीत मध्यरात्री घडलेल्या या रक्तरंजित घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. झोपेत असलेल्या पत्नी आणि अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा पतीनेच कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याने मानवी नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रविवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास प्रभाग क्रमांक १ मधील शिक्षक कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (३०) आणि तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के (४) यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणारा पती राहुल हरी म्हस्के (३५) यालाच या दुहेरी हत्याकांडाचा आरोपी म्हणून मेहकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राहुल म्हस्के, पत्नी रूपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंद म्हस्के, आई ताराबाई हरी म्हस्के आणि आजी असे सहा जण एकत्र राहत होते. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना राहुलने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि झोपेत असलेल्या पत्नी व मुलाच्या डोक्यावर सपासप वार केले. क्षणातच घर रक्ताने माखले.
आवाज ऐकून आई ताराबाई म्हस्के जाग्या झाल्या. बाहेर येताच समोर दिसलेले दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सून आणि नातवंड पाहून त्यांनी आक्रोश केला. शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. गंभीर जखमी रूपाली यांना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले; उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी राहुलने स्वतःला आणि मुलगा रियांशला घरातील आतील खोलीत कोंडून घेतले होते. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता रियांश रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदारांसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारित्र्यावरील संशयाची पार्श्वभूमी, मानसिक स्थिती आणि घटनेमागील नेमके कारण याचा सखोल तपास सुरू आहे.
चार वर्षांचा निष्पाप रियांश या विकृत संशयाचा बळी ठरल्याने मेहकर शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. घरगुती संशय आणि मानसिक अस्थैर्य किती भयावह टोक गाठू शकते, याचे हे थरारक आणि काळीज पिळवटून टाकणारे उदाहरण ठरत आहे.