– चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात उद्धव ठाकरे यांची रेकॉर्डब्रेक सभा, तब्बल एक लाखापेक्षा जास्त उसळला जनसमुदाय
चिखली, जि. बुलढाणा (एकनाथ माळेकर/महेंद्र हिवाळे) – शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला तेव्हाच ठरवले होते, मुंबईबाहेर पहिली सभा होईल, ती बुलढाण्यात जिथे जिजाऊंचे जन्मस्थान आहे तिथेच घेईन. ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची आहे. म्हणून आई जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. अशीच एकजुटीची ताकद दाखवून या गद्दारांना या जिजाऊंच्या मातीत कायमचे गाडा, अशी हाक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिखली येथे उसळलेल्या तुफान गर्दीला आणि निष्ठावंत शिवसैनिकांना दिली. चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ठाकरे यांची अतिविराट जाहीर सभा पार पडली. या सभेला तब्बल एक लाखापेक्षा जास्त शिवसैनिक जनसमुदायाची गर्दी उसळली होती. या सभेने विदर्भ, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात उत्साहाची लाट निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंडखोर आमदार व खासदारांवर घणाघाती टीका करत, आपल्या शब्दबाणांनी या बंडखोरांचे जाहीर वाभाडे काढले. तसेच, ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य काय ठरवणार? अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. काही लोकं आज नवस फेडायला गेलेत, काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार? त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं, अशी स्थिती या गद्दारांची आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी ठाकरे यांनी विराट जनसमुदयाच्या साक्षीने केली.
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या सभेतून बंडखोरांवर तुफान टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, की काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य काय ठरवणार? यांचे मायबाप दिल्लीत आहेत. त्यांचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हे हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेले होता का? ‘इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना (भावना गवळी यांचा नामोल्लेख टाळून) धमक्या दिल्या. मुंबईवरून दलाल पाठवले जायचे. त्यांच्यावरील आरोप वाचले जायचे. त्यांच्या आजूबाजूच्या दलालांना अटक केली. पण ताई हुशार. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, तो फोटो छापून आणला. सीबीआय आणि ईडीची हिंमत आहे का मग अटक करायला? ही चालूगिरी आपल्याला समजत नाही का?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
बुलडाण्यात मला काही जुने चेहरे दिसत नाहीत, असे म्हणत ठाकरे यांनी जिल्ह्यातील बंडखोरांना पैâलावर घेतले. कारण ते जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं बुलडाणा म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता आहे. पण इथं जमलेले मर्द मावळ्यांचा उत्साह बघितल्यांवर असं वाटतंय की अन्याय जाळायला निघालेल्या या पेटत्या मशाली आहेत. जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. मी नव्या जोशाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. भाजप हा आयात पक्ष झाला आहे. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार आहे? यांच्या पक्षात आयात केलेले नेते आहेत. भाजप भाकड पक्ष आहे, असे टीकास्त्र त्यांनी भाजप व बंडखोरांवर डागले. संविधान आज सुरक्षित आहे का?, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. लोकशाही वाचवण्याच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. काहीजण चाळीस रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी आज गुवाहाटीला गेलेल्या मुख्यमंत्र्यांसह चाळीस बंडखोर आमदारांना लगावला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी खेडेकर यांनी त्यांचे कौटुंबीक स्वागत केले. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी तर खेडेकर यांना कडकडाडून मिठी मारत गळाभेट घेतली. यावेळी ठाकरे व खेडेकर यांच्यात बराचवेळ खासगीत चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप हाती आला नाही.
गद्दारांनो, भाजपच्या तिकीटावर निवडून येणार नाही, हे जाहीरपणे सांगा!
मी शेतकर्यांना कर्जमुक्त करून दाखवले होते, असे ठामपणे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, माझं उघड आव्हान आहे; मी या ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय, आम्ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार नाही, हे यांनी जाहीरपणे सांगावे. जेव्हापासून हे खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मी शेतकर्यांची कर्जमुक्ती केली होती. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. ती करणार होतोच, पण तोपर्यंत या चाळीस रेड्यांनी शेण खाल्लं. या खोके सरकारने शेतकर्यांचे वीजबिल माफ केले नाही. शेतकर्यांना पीकविम्याचे पैसेदेखील दिले नाहीत. पीकविमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारादेखील उद्धव ठाकरे यांनी दिला.
४० रेडे नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले – संजय राऊत
मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे, आणि ४० रेडे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले. ‘सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहे. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? ‘हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बाजूला शेगाव आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे’, असेही ते म्हणाले. ‘मी जवळजवळ ११० दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा दुपट्टा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असेल. येत्या निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवे, शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तेव्हाच आपण स्वत:ला शिवसैनिक म्हणू शकू’, असेही खा. राऊत यांनी नीक्षून सांगितले.
———————