-भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका; वन्यजीव संरक्षणाचा दिला सकारात्मक संदेश
बुलढाणा (महेंद्र हिवाले) : बुलढाणा परिसरात एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ हस्तक्षेप करून हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली आणि त्याचे प्राण वाचविले.
वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता आणि जीवसृष्टीबद्दलची आस्था यांचे उत्कृष्ट उदाहरण आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या धाडसी व मानवतावादी कृतीमुळे वन्यजीव संरक्षणाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे. वन विभागाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या या स्तुत्य कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, वन्यजीव संरक्षणासाठी सर्व नागरिकांनीही अशाच प्रकारे जागरूकता व सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना उपवनसंरक्षक जमीर मुनीर शेख (आयएफएस) म्हणाले, “आमदार संजय गायकवाड यांनी संकटात सापडलेल्या हरणाचे प्राण वाचवून वन्यजीवांप्रती असलेली आपली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांचे हे कार्य वन्यजीव संरक्षणासाठी प्रेरणादायी असून समाजात सकारात्मक संदेश देणारे आहे.”