-‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत जलसंरक्षणाचा संकल्प; मान्यवरांची उपस्थिती
देऊळगाव घुबे ता. चिखली (राजेंद्र घुबे/प्रतिनिधी) : ‘जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण’ या संदेशासह संत निरंकारी मंडळ शाखा चिखलीच्या वतीने वायझडी तलावाची स्वच्छता करण्यात आली. ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (२२ फेब्रुवारी) उत्साहात पार पडला.
Sant Nirankari Mission यांच्या सामाजिक शाखा Sant Nirankari Charitable Foundation यांच्या पुढाकाराने देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ९३० शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानाचा उद्देश जलसंरक्षण, स्वच्छता व पर्यावरण संतुलनाबाबत जनजागृती करणे हा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील विविध शाखांनी अनेक जलस्रोतांची स्वच्छता केली. चिखली शाखेच्या वतीने वायझडी तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी जिल्हा संयोजक तथा ज्ञान प्रचारक शालिकराम चवरे गुरुजी, चिखली नगरपरिषद आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, नगरसेवक दीपक वाधवानी, सुरेंद्र ठाकूर, पुरुषोत्तम वायाळ, अमोल लहाने, श्रीराम झोरे, गोकुळ शिंगणे आदी उपस्थित होते. चवरे गुरुजी यांनी मंडळाच्या सेवा कार्याची माहिती दिली. सभापती जोगदंडे यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त करत आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. दिल्ली येथे आयोजित विशेष सत्संगात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी “भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी” असा संदेश दिला. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीनुसार सेवा, सुमिरण व सत्संग हेच जीवनाचे अधिष्ठान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा संदेश केवळ अभियान नसून जीवनदृष्टी असल्याचे सांगण्यात आले. जलधारांची स्वच्छता राखत पर्यावरणपूरक व शाश्वत भविष्यासाठी सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.