-मेहकर तालुक्यात मशाल धगधगतेय! पांगरखेडचे माजी सरपंच गणेश नालिंदेंसह अनेकांचा उबाठात प्रवेश!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : प्रशासनाच्या हाकेला ओ देत गावकऱ्यांनी एकजुटीने विविध उपक्रम राबवत पांगरखेडला आदर्श गाव बनविले. याच गावच्या धर्तीवर मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली. तालुक्यातील आदर्श गाव पांगरखेडचे माजी सरपंच गणेश नालिंदेंसह अनेकांनी काल २३ डिसेंबर रोजी मेहकर येथील जनसंवाद कार्यालयात आमदार सिद्धार्थ खरात, सह उपजिल्हाप्रमुख आशिष राहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते.
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही आमदार खरात यांनी यावेळी दिली. माजी सरपंच गणेश नालिंदे यांनी आपल्या कार्यकाळात पांगरखेड गाव आदर्श बनण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गावाला राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांचा जनमानसात दबदबा असल्याने ग्रामीण भागात पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचा आशावाद देखील आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला.
यावेळी नामदेव काटेकर, धनसिंग राठोड, गजानन तोंडे, किशोर आप्पा नायगावकर, संतोष बोंधाडे, अशोक बघे यांच्यासह अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी सभापती भास्करराव गारोळे, विठ्ठलवाडीचे सरपंच धनराज राठोड, चंद्रभान शिंगणे, भागवत बोरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.