-विषारी हवेत अडकलेली राजधानी; दिल्ली गुदमरतेय
नवी दिल्ली (अवेश तिवारी) : देशाची राजधानी दिल्ली सध्या अक्षरशः गुदमरतेय. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोक्याच्या सर्व मर्यादा ओलांडत ‘अत्यंत गंभीर’ पातळीवर पोहोचला असून, राजधानीत श्वास घेणंही आता जीवघेणं ठरत आहे. अनेक भागांमध्ये AQI ४५० ते ५०० च्या पुढे गेला असून, तज्ज्ञांनी याला थेट “मृत्यूरेषेच्या पलीकडची हवा” असे संबोधले आहे. दिल्ली सध्या जणू एका अदृश्य गॅस चेंबरमध्ये अडकली असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे.
प्रदूषित हवेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दमा, हृदयरोग आणि श्वसनविकार असलेले रुग्ण सर्वाधिक धोक्यात आले आहेत. राजधानीतील रुग्णालयांमध्ये श्वसनाचे आजार, डोळ्यांची तीव्र जळजळ, छातीत जडपणा, श्वास घेण्यास त्रास आणि सतत खोकल्याच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सकाळच्या वेळेस संपूर्ण शहर दाट, विषारी स्मॉगच्या चादरीखाली झाकले गेले असून सूर्यप्रकाशही फिकट आणि धूसर दिसत आहे.
वाहनांमधून होणारे उत्सर्जन, औद्योगिक धूर, सुरू असलेली बांधकामे आणि शेजारील राज्यांतील शेतकऱ्यांकडून होणारी पिकांच्या अवशेषांची जाळपोळ यामुळे दिल्लीच्या हवेत प्रचंड प्रमाणात घातक कण मिसळले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी विविध निर्बंध आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्याची परिस्थिती केवळ तात्पुरती समस्या नसून, याचे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढते प्रदूषण हे आता पर्यावरणापुरते मर्यादित न राहता थेट मानवी आयुष्याचे संकट बनले असून, दिल्लीतील नागरिक अक्षरशः “श्वासासाठी झगडत” असल्याचे वास्तव समोर आले आहे.
दिल्लीची ही भीषण अवस्था संपूर्ण देशासाठी गंभीर इशारा ठरत असून, तातडीने कठोर आणि प्रभावी निर्णय न घेतल्यास राजधानीसह इतर महानगरांनाही अशाच संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.