-रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अंकुश पाटील (चिखली) : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, बाजारपेठेचे स्वातंत्र्य आणि इतर विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असताना, शासनाकडून अद्याप ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, बुलढाणा यांच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी आज चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून तुपकर यांच्या आंदोलनातील मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली. निवेदनात कणखर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. शेती उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिणामी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून अनेक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशाराही त्यांनी दिला. निवेदनाद्वारे सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, तसेच जागतिक तंत्रज्ञान व बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू’
यावेळी बोलताना देविदास कणखर म्हणाले की, शासनाने रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ठाकूर सुनाजी लुदे, प्रकाश येडूजी धुळे, विनायक सरनाईक, गणेश थुट्टे, राजू शेटे, मुरलीधर येवले, धोडू सोळंकी, विनोद थुट्टे, नरहरी थुट्टे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.