-वीज कपातीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मागण्या मान्य करण्याचे आश्वासन
बोधेगाव (प्रतिनिधी) : शेवगाव ग्रामीण महावितरणकडून २५ मे २०२६ पासून शेतीसाठीच्या वीजपुरवठ्यात अचानक दोन तासांची कपात करण्यात आल्याने संतप्त झालेल्या घोटण परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी घोटण बसस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन छेडले. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि शेतीपिकांना पाण्याची वाढती गरज असताना वीजपुरवठा कमी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वीज कपातीमुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी घोटण शिवारातील आणखी एक गंभीर प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. महामार्गालगत उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांच्या तारा अनेक जुन्या वृक्षांमधून जात असल्याने वारंवार स्पार्किंग होत असून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार करण्यात आली. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड न करता सदर वीजवाहिनी रस्त्याच्या मध्यभागापासून सुमारे १५ मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय टाकळकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत गावठाणातील दोन तासांचा वीजपुरवठा कमी करून शेतीसाठी पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून महावितरणने तातडीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लवांडे, तालुकाध्यक्ष मेजर भोसले, बाळासाहेब फटांगरे, केदारेश्वर संचालक रंजीत घुगे, लक्ष्मणभाऊ टाकळकर, सरपंच सुधीर पवार, कुंडलिक घुगे, भारत मोटकर, विष्णू घुगे, ज्ञानेश्वर कुलट, सरपंच गोकुळ भागवत, रामहरी घुले, तुकाराम थोरवे, विष्णूपंथ राटाळ, माऊली विघ्ने, राजेंद्र मोटकर, कारभारी थोरात, बापुराव शेळके, संजय क्षिरसागर, पिरमहमद शेख, संदीप मोटकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. अखेर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नरके यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.