– भाजप कार्यकर्ते व युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण; आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून पक्षाने सोपावली महत्वपूर्ण जबाबदारी!
चिखली (राजेश लोखंडे) – भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा, दि. २४ जुलैरोजी जिल्हाध्यक्ष तसेच बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी जाहीर केली. या नव्या कार्यकारिणीत चिखली तालुक्यातील वळती गावाचे सुपुत्र पंजाबराव धनवे पाटील यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिखलीच्या विकासकन्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंजाबराव धनवे पाटील यांचा राजकीय प्रवास अत्यंत खडतर तसेच प्रेरणादायी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वळती या छोट्याशा गावातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. काँग्रेसमधून गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी पहिले पाऊल टाकले आणि नंतर सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर माजी आमदार ध्रुपतराव सावळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकाळात त्यांनी चिखली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्षपद भूषवले, जिथे त्यांनी युवा शक्तीला संघटित करून पक्षाच्या कार्याला चालना दिली. त्यांनी तालुक्यातील युवकांमध्ये पक्षाविषयी जागरूकता निर्माण केली. यानंतर जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष आणि विधानसभा संयोजक अशा विविध जबाबदार्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. आता त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, जी त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. पंजाबराव धनवे पाटील यांनी आपल्या या यशाचे श्रेय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि विश्वासामुळे मला ही संधी मिळाली. मी पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे वळती गावासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचे सहकारी, मित्र आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंजाबराव धनवे यांच्या या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा उपयोग पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि जनसामान्यांच्या हितासाठी होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.