– संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज वाघ यांचा हल्लेखोरांना रोखठोक इशारा
बुलढाणा (राजेश लोखंडे) – तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे काल दि. १३ जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणाची संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज वाघ यांनी तीव्र शब्दात निंदा केली असून, हाच तुमचा जनसुरक्षा कायदा आहे का?, असा संतप्त सवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय भान ठेवून शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी संघटना आहे. प्रवीणदादा गायकवाड हे एक प्रगल्भ नेतृत्व असून, समाजमन सुदृढ व निरोगी रहावे, ह्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असतात. त्यांची अभ्यासू व वैचारिक प्रगल्भता त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. त्यामुळे अख्या महाराष्ट्राने त्यांच्या पाठीशी, उभे राहून ह्या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनोज वाघ यांनी केले आहे. तसेच, हल्लेखोरांना जशाच तसे उत्तर देण्याचाही रोखठोक इशारा दिला आहे.
पुढे बोलतांना म्हणाले की, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड हे दि. १३ जुलै २५ रोजी अक्कलकोट येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले असतांना त्यांच्यावर पाळत ठेवून भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे व त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजितपणे शाईफेक करून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला. संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव बदलून ‘धर्मवीर संभाजी ब्रिगेड’ करा, अन्यथा घरात घुसून मारू, अशी खुलेआम धमकी मागच्या काही महिन्यांपासून या भाजपच्या कार्यकर्त्याकडून दिली जात होती. भाजपचा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर सोलापूरकर, कोरटकर प्रमाणेच सरकारने कारवाई केली नाही, हे उघड आहे. हीच आधुनिक पेशवाई आहे. गेली ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात तरुणांना दिशा देण्याचे काम करणार्या प्रविणदादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याची ही घटना शासन, प्रशासन आणि पोलिस खात्याचे धिंडवडे काढणारी आहे. ही सरकारी यंत्रणेची सपशेल हार आहे. फडणवीसांच्या काळात कदाचित हेच अपेक्षित आहे. पेशवाई यापेक्षा वेगळी नसावी. नुकताच राज्य सरकारने राज्यात जनसुरक्षा कायदा मंजूर करून डाव्या विचारांच्या संघटनांवर कारवाईचे संकेत दिले आहेत, त्या पार्श्वभूमीवर उजव्या विचारांच्या संघटनांची ही दादागिरी सरकार पुरस्कृत आहे का? दीपक काटे, भिडे यांना हा कायदा लागू होणार नसेल तर आम्ही त्याची होळी करतो. यांच्यावर कारवाई न करता त्यांना असे हल्ले करण्याची मुभा दिली जाणार आहे का? फडणवीसांना हेच भ्याड हल्ले अपेक्षित आहेत का? हा सरकार पुरस्कृत दहशतवादी हल्ला आहे का?
संभाजी ब्रिगेड संघटना गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहे. संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही. महापुरुषांचे नाव संघटनेला, पक्षाला, शहराला, गावाला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या भ्याड व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचे नाव शिव धर्म फाउंडेशन असे आहे, मग हे नाव एकेरी आहे की आदरार्थी हा प्रश्न त्या भ्याड हल्लेखोराने आधी स्वतःला का विचारला नाही. विरोधी विचारसरणीच्या संघटनेचे नाव काय असावे हे ठरवायचा अधिकार यांना कुणी दिला. यामागे भाजपचे वेगळेच राजकारण शिजत आहे का? हा प्रश्न आहे. दीपक काटे हा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे विमानतळावर रिव्हॉल्वर आणि जीवंत काडतूसांसह पकडण्यात आले होते. इंदापूर एमआयडीसीमध्ये इतर अनेक ठिकाणी खंडणी मागितल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच बरोबर त्याने सख्ख्या चुलत भावाचा खून केल्याने आठ वर्ष येरवडा जेलमध्ये काढलेला एक खुनी असून, वेगवगेळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव आहे. अशा लोकांना राजकीय अभय दिले जाते, हेच भाजपचे अच्छे दिन आहेत का? संभाजी ब्रिगेड आणि सर्व समविचारी संघटना या भ्याड हल्ल्याचा निषेध करून थांबणार नाहीत. आम्ही निवेदने देऊन, निषेध करून आता थांबणार नाही. सोलापूरकर, कोरटकर प्रकरणी सरकारची भूमिका हीच यावेळीही असणार आहे, त्यामुळे हे सततचे हल्ले थांबवण्यासाठी ही विकृती ठेचावीच लागणार आहे, आणि आम्ही ती ठेचणार आणि हाच आमचा संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे. आता आम्ही घरात घुसून मारू. ही वेळ आलेली आहे. ती वेळ सरकारने आमच्यावर आणली आहे, असेही मनोज यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवरील हा हल्ला म्हणजे शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवरील हल्ला!
संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षावरचा हल्ला म्हणजे येथील सामान्य कार्यकर्त्याच्या अस्मितेवर हल्ला आहे. आम्ही कायद्याला मानतो, याचा अर्थ आम्ही निमूटपणे अन्याय सहन करून घेऊ असा होत नाही. आता बस्स आम्ही आता सहन करणार नाही, भगतसिंग यांच्या भाषेत ‘हमारे धमाको की गुंज आवाज बनकर गुंजेगी’ आम्ही जशास तसे उत्तर देऊ, भाजपचा पदाधिकारी इतका माज कोणाच्या जीवावर करतो ? संभाजी ब्रिगेड हा माज मोडणार, असे मनोज वाघ यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकाचे शेवटी असेही म्हटले आहे.
———-