मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील मराठा समाजाला जाहीर करण्यात आलेले आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा महासंघाचा लढा सुरूच राहील, असे मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात काल मूक आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या वेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी अंदोलनाचे नेतृत्व केले. मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानावटे, युवा अध्यक्ष रणजित जगताप यांच्यासह राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते अंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलन करते समय बोलताना संभाजीराव दहातोंडे म्हणाले, न्यायालयाने ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलेले नाही, जोपर्यंत दुसरे पर्यायी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरातील तहसीलदारांनी या निर्णयाचा वेगळा अर्थ काढला व मराठ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रापासून वंचित ठेवले. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याचा फेरआढावा घ्यावा व प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी. मराठा समाजाला आरक्षण मिळणे फार गरजेचे आहे, कारण मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे अनेक तरुणांचे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठा समाजाला तातडीने आरक्षण देऊन सरकारने हा प्रश्न सोडवावा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. सरकारी पातळीवर याबाबत दाखल घेतली नाही तर मराठा महासंघ अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे.