– काँग्रेसचा कर्जमाफी, पीकविमा, शेतमालाला भाव यासाठी एल्गार मोर्चा!
लोणार (वाजेद खान) – शेतकरी कर्जमाफी, शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव, थकलेला पीकविमा, सिंचन अनुदान व इतर शेतकरी हितांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा सोमवारी (दि.३) शेतकर्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेश मापारी व शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार, सोमवार, दि.०३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा काँग्रेस मुख्यालय, जयस्तंभ चौक बुलढाणा येथून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांचा हा मोर्चा निघणार आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव, थकलेला पीकविमा, सिंचन अनुदान व इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काढला जाणारा हो मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या एल्गार मोर्चामध्ये शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लोणार तालुक्यातील व शहरातील शेतकरी बांधवांनी व लोणार तालुक्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व या मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, अशी आवाहन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद व तालुका अध्यक्ष राजेश मापारी यांनी केले आहे.