– मेहकर-जालना रोडवरील पिंपळगाव लेंडी फाट्यावरील घटना, १५ ते २० भाविक गंभीर जखमी
– टिप्परमध्ये धूर करून रस्त्यावर फिरवले तेव्हा आग्या मोहोळ पांगले, अनेक दुचाकीस्वारही जखमी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मेहकर ते जालना रोडवरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर आग्या मोहोळाने हैदोस घालून महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र निर्मळेश्वर संस्थान पिंपळगाव लेंडी येथे यात्रेला आलेल्या भाविकांवर हल्ला चढविला. त्यात सुमारे १५ ते २० भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हे आग्या मोहोळ पांगविण्यासाठी एका टिप्परमध्ये धूर करून हे टिप्पर रस्त्यावर फिरवावे लागले. त्यानंतर अतिशय आक्रमक झालेले मोहोळ पांगले. यात अनेक दुचाकीस्वारदेखील जखमी झालेत. जखमींवर खासगी व शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आग्या मोहोळाने अचानक हल्ला केल्याने यात्रेत मोठा गोंधळ उडाला. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रल्हाद रंदवे (वय ७०), त्यांच्या पत्नी शुशला रंदवे (वय ६५) या दोघा गंभीर जखमींना अमोल पवार यांच्या स्विफ्ट गाडीमधून ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले होते. तसेच तहसील कार्यालयामधील बाबू इंगोले यांना सरकारी अॅम्बुलन्समधून हलविण्यात आले आहे. आग्या मोहोळाच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असताना सरकारी अॅम्बुलन्स १०८ वर फोन करून मदत मागितली असता, ही अॅम्बुलन्स तब्बल अर्धा तास उशिरा मिळाली. फक्त नऊ किलोमीटर अंतरावर असलेले लोकेशनसाठी अॅम्बुलन्सला येण्यासाठी अर्धा तास लागला. तसेच, सरकारी रूग्णालयातून घटनास्थळी आग्या मोहोळ पांगविण्यासाठी कोणतेच धूर यंत्रदेखील मिळाले नाही.
्आक्रमक झालेले हे मोहोळ पांगविण्यासाठी गजानन गायके, अविनाश गायके व त्यांच्या सहकारी मित्रांनी टिप्परमध्ये धूर करून रोडवर फेर्या मारल्यानंतर हे आग्या मोहोळ पांगले. व त्यानंतर लोकांवरील हल्ले कमी झाले. त्यांना ज्ञानेश्वर तिकटे, बंडू गायके, सुभाष गायके, शिवाजी लबडे, गजू गायके, नंदू तिकटे आदींनी कचर्याच्या सहाय्याने धूर करून अंगावरील आग्या मोहोळाच्या माश्या पळविण्यासाठी सहकार्य झाले. मोहोळाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जालना येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे, तर काहींवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या रोडने सिंदखेडराजाकडे जाताना मोटारसायकल चालकांनी काळजी घ्यावी. पिंपळगाव फाट्याजवळ आग्या मोहळाच्या माश्या अद्यापही घोंगावत असून, त्यापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. या माश्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत १५ ते २० स्त्री-पुरूष जखमी झाले असून, त्यांच्यावर किनगावराजा येथील समर्थ हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल, पातुरकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.