आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसाने इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या महापुराच्या पाण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून, पालिकेच्या संबंधित ठेकेदाराने इंद्रायणी नदीतील जलपर्णी वेळीच नदी बाहेर न काढल्याने, महापुराचे पाण्यात वाहून आलेली ही जलपर्णीं मोठ्या प्रमाणात आळंदीत साचली आहे. आळंदीतील बंधारे आणि पुलालगत येऊन, साचून जलपर्णी अडकली असल्याने इंद्रायणी नदीप्रदूषणासह आता जलपर्णी काढण्याची समस्यां प्रशासनापुढे उभी राहिली आहे.
आळंदी नगगपरिषद क वर्ग नगरपरिषद असून येथील पालिकेची तोकडी यंत्रणा असल्याने नदी पात्रा बाहेर जलपर्णी काढण्याची मोठी डोकेदुखी वाढली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून महापुराचे पाण्यासमवेत वाहून आलेली जलपर्णी हे पिंपरी महापालिकेचे महापाप देवभूमी आळंदीचे माथी मारले जात असल्याची भावना आळंदीत वाढत आहे. पिंपरी महापालिकेने येथील जलपर्णी काढण्याचा खर्च आळंदी पालिकेस देण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदीतील जलपर्णी नदी पात्रा बाहेर वेळच्या वेळी काढली जात नसल्याने आळंदीत ही समस्यां संतापजनक व गंभीर झाली असल्याचे पुणे जिल्हा भ्रश्टाचार विरोधी जनआंदोलनचे जिल्हा संघटक पै.बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषदेने जलपर्णी समस्यां मुक्त आळंदीतील इंद्रायणी नदी राहावी यासाठी काम हाती घेतले असून नदी पात्रातील जलपर्णी पुलाला अडकलेली काढण्याचे काम सुरु केले असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून महापुराचे पाण्यात वाहून आलेली जलपर्णी आळंदीत समस्यां निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी महापालिकेस या जलपर्णीचे अनुषंगाने यापूर्वी देखील पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
महापुराचे पाण्यात वाहून आलेली जलपर्णी नवीन पूल गोपाळपुरा, जुना व पाणी साठवण बंधारा तसेच चौंडी जवळील नवीन पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत येऊन साचून अडकली आहे. येथे जलपर्णी हटविण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जलपर्णी नदीतून काढण्याचे काम सुरु असल्याने रहदारीला पूल बंद करण्यात आला. यामुळे आळंदीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक, वाहन चालक यांनी नाराजी व्यक्त केली.
येथील इंद्रायणी नदी जलपर्णी व जलप्रदूषण मुक्त ठेवण्याची मागणी करण्यात आली असून खासदार सुप्रिया सुळे यांनाही या संदर्भात आळंदी ग्रामस्थांनी साकडे घातले आहे.