-तहानलेल्या पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; आमदारांच्या हस्ते उद्घाटन झालेले प्रतीक्षालयालाही कुलूप
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सध्या उन्हाचा पारा ४२ अंशांच्या पार गेला असून सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. मागील महिन्यात पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला होता. मात्र, स्वतः पंचायत समितीच तहानलेली असल्याने या बैठकीचे फलित काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सिंदखेडराजा पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील १०४ गावांचा समावेश होतो. शिक्षण, आरोग्य, घरकुल, शेतीसंबंधित कामे, विहीर अनुदान तसेच विविध शासकीय योजनांसाठी नागरिक पंचायत समितीत येत असतात. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना पंचायत समितीमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. कर्तव्यदक्ष आमदार मनोज कायंदे यांनी नुकतीच पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीसाठी प्रत्येक गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना बोलावण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेल्या पत्रकारांना गटविकास अधिकाऱ्यांनी टाळल्याचा आरोप होत आहे. पंचायत समितीच्या कारभाराचे वाभाडे निघू नयेत म्हणून पत्रकारांना दूर ठेवण्यात आले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सिंदखेडराजा पंचायत समितीला ग्रामीण भागाचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. तालुक्यातील सुमारे १०४ गावांतील नागरिक घरकुल, रोजगार हमी, पशुसंवर्धन, कृषी आणि विविध योजनांच्या कामांसाठी येथे येतात. साखरखेर्डा परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना ५० ते ६० किलोमीटर अंतर पार करून पंचायत समितीत यावे लागते.
पंचायत समिती परिसरात आल्यानंतर झाडांच्या सावलीखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गाड्या उभ्या दिसतात. मात्र, नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे “माणसांपेक्षा गाड्यांनाच अधिक किंमत आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. बंद पडलेल्या जलकुंभाच्या सावलीत अनेक वयोवृद्ध महिला आणि पुरुष बसून आश्रय घेताना दिसतात. मात्र, ही परिस्थिती गटविकास अधिकाऱ्यांना दिसत नाही का? किंवा काही जुने कर्मचारी त्यांची दिशाभूल करत आहेत का? अशी चर्चा रंगत आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी अंकुश मस्के यांनी पंचायत समितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत रंगरंगोटी केली होती. तसेच नागरिकांसाठी फिल्टरचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, नवीन प्रशासन आल्यानंतर नागरिकांसाठी असलेली पाणपोईही गायब झाल्याचे दिसत आहे.
आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर हे प्रतीक्षालय कायमचे बंद ठेवण्यात आले असून त्याला कुलूप लावण्यात आले आहे. नागरिकांसाठी पंचायत समितीचे सभागृह खुले करून बसण्याची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. ओळखीच्या आणि वजनदार कार्यकर्त्यांसाठी सभापतीचे दालन खुले करणारे प्रशासन सर्वसामान्य नागरिकांसाठीही संवेदनशीलता दाखवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.