– इंद्रायणी नदी घाटावर पुष्पांजली अर्पण करून गांधी विचारांचे स्मरण
आळंदी (अर्जुन मेदनकर) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करत महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, समता आणि बंधुभावाच्या विचारांचे स्मरण केले. आधुनिक स्पर्धेच्या युगात गांधी विचार अधिक महत्त्वाचे असून, ते केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका, आळंदी शहराध्यक्ष संदीप नाईकरे पाटील, माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, मयुर कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, गौरव सदानंद, राजेश नागरे, साहेब बांगर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत सत्य, अहिंसा, समता आणि शांततेच्या मूल्यांची समाजाला अधिक गरज आहे. गांधी विचार समाजात सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी मार्गदर्शक ठरत असून, प्रत्येकाने ते आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.