– शेतकरी–कुणबी–मराठा समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या लढवय्या नेत्याच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी जनहित फाऊंडेशन, आळंदी देवाची व पसायदान गुरुकुल पंचमुखी शिक्षा पद्धती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अप्पासाहेब कड यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या अविस्मरणीय सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यात आला. गावागावातील शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या या योद्ध्याचा सन्मान करणारा हा सोहळा भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
शेतकरी कुणबी मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. कड यांना पुरस्कार उत्तरप्रदेश लखनौचे माजी आमदार चंद्रिका प्रसाद, आळंदी जनहित फाऊंडेशनचे सचिव रामदास दाभाडे तसेच शालेय वारकरी संप्रदायातील साधक मुलांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संयोजक योगेश वाघ गुरुजी, आवेकर–भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त व जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ पोटवडे, शिवाजी घारे, दत्तशेठ लोणारी, गौतम पाटोळे, हमीद शेख, दिनकर तांबे, कैवल्य टोपे, रामेश्वर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अप्पासाहेब कड यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारला. शेतकरी कुटुंबांच्या अडचणी, त्यांच्या न्यायाच्या लढाया आणि सामाजिक upliftment हीच त्यांची साधना. स्वतःचा वेळ, आराम, वैयक्तिक सुख बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या या नेतृत्वात जनतेसाठीची करुणा आणि संघर्षाची ऊर्मी कायम दिसून आली. त्यांच्या कार्यामुळे अनेक संकटग्रस्त कुटुंबांना आधार मिळाला, विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि समाजात सकारात्मक परिवर्तनाला दिशा मिळाली. या सेवाभावी कार्याची दखल म्हणून त्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पावन तिथीचे औचित्य साधत हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर सिद्धबेट येथे वृक्षारोपण करण्यात आले, तर पसायदान गुरुकुलातील बालगोपालांना स्नेहभोजनाच्या माध्यमातून सुग्रास मेजवानी देत सोहळ्याने आनंददायी रंग घेतला. डॉ. कड यांची सेवा व संघर्षाची कहाणी ही एका व्यक्तीची नव्हे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची, आशेची आणि लढाईची कहाणी आहे. त्यांच्या सन्मानाने ‘जीवन गौरव पुरस्काराची उंची अधिक वाढली’, असे विविध मान्यवरांनी मनोगतात नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले, तर आभार योगेश वाघ गुरुजी यांनी मानले.