– ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पत्रकारांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ करणार सन्मान
– फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात मान्यवरांच्याहस्ते होणार सन्मान; नाव नोंदणींचे आवाहन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सामाजिक सौहार्द आणि शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा, या हेतुने पत्रकार आपली लेखणी झिजवतात. तरीही पत्रकार हा समाजाकडून अनेकदा दुर्लक्षित राहून जातो. ज्यांनी आपले आयुष्य पत्रकारितेसाठी समर्पित केले, अशांचा सन्मान झाला पाहिजे, या उदात्त भावनेतून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकारांना ‘पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्याचे निश्चित केले आहे. हा सोहळा बुलढाणा जिल्हा मुख्यालयी आयोजित केला जाणार असून, सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्याहस्ते केले जाईल. पुढील महिन्यात, फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात हा गौरव सोहळा होणार आहे. ज्या पत्रकारांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा क्रियाशील पत्रकारांना सोहळ्यामध्ये गौरविले जाणार आहे.
पत्रकारितेला समृद्ध करण्यासाठी अनेक पत्रकारांनी आपले आयुष्य वेचले आहे. प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून पत्रकारांनी पत्रकारितेचे व्रत जपले आहे. सामाजिक जडघडणीमध्ये प्रचंड योगदान देणार्या या घटकाला आयुष्याच्या उत्तरार्धात अविस्मरणीय सत्काराची भेट देणे ही कृतज्ञता असल्याची भावना बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांनी व्यक्त केली आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप असेल. सदर पुरस्कारासाठी पात्र ठरणार्या पत्रकारांनी सपत्नीक सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे. केवळ पत्रकारच नव्हे तर तर जे वृत्तपत्र विक्रेते ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत, परंतु ते अजूनही वृत्तपत्र विकण्याचे काम करत आहेत, अशांचाही सन्मान केला जाणार आहे. जे पत्रकार पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कारासाठी पात्र आहेत, अशांनी आपले आधारकार्ड आणि संक्षिप्त माहिती बुलढाणा जिल्हा पत्रकार संघअंतर्गत संबंधित तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांकडे द्यावी. सदर पुरस्काराच्या नियोजनासाठी दहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव (मो.नं. ९८३४४९०११७) यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश मुडे बुलढाणा, अजय काकडे बुलढाणा, पंजाबराव ठाकरे संग्रामपूर, शेख अन्सार मेहकर, विठ्ठल देशमुख सिंदखेडराजा, योगेश शर्मा चिखली, राजकुमार व्यास शेगांव, सुरज गुप्ता देऊळगांवराजा आणि योगेश उबाळे धाड असे मान्यवर पत्रकार या पुरस्कार केंद्रीय नियोजन समितीत काम करतील. पत्रयोगी पुरस्काराच्या नाव नोंदणीसाठी अंतिम मुदत ५ फेब्रुवारी २०२५ राहील. अधिक माहिती करिता बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत ९८५०३७७३४४, सरचिटणिस कासिम शेख ९८९०९३६३२२, कार्याध्यक्ष वसिम शेख अन्वर ९४२२२६६३४५, सचिव शिवाजी मामनकर ८३९०७९५६६२ तथा जिल्हा कार्यकारिणीतील इतर पदाधिकार्यांशी संपर्क करता येईल. विशेष म्हणजे, याच धर्तीवर चांगले वृत्तांकन करणार्या पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुढचा सोहळा घेतला जाणार आहे, असे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून घोषीत करण्यात येत आहे.