अहमदनगर (जिल्हा प्रतिनिधी) – नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. हॉटेल सुखसागर व नगर महापालिका यांच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे नगरमध्ये डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ऐतिहासिक निकालाबद्दल तमाम बहुजन समाजाच्यावतीने न्यायदेवतेचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत.
बहुचर्चित या वादाचा आज निकाल लागणार असल्याने, आंबेडकरी चळवळीतील नेते अजय साळवे, युवा नेते सुमेध गायकवाड, सोमाभाऊ शिंदे, अतुल भिंगारदिवे आदी नेते आज औरंगाबाद येथे गेले होते. निकाल जाहीर होताच, या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. बहुजन समाजाची मागणी पूर्ण होत असल्याने त्यांनी न्यायदेवतेचे आभारदेखील व्यक्त केले आहेत. हा खटला जिंकल्याबद्दल अॅड. होन, अॅड. लोखंडे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचे आभार व्यक्त करत आहोत, असे या नेत्यांनी कळवले आहे.
——————