-तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : भामा-आसखेड प्रकल्पातून आळंदी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या विद्युत पंपिंगविषयक आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यामुळे बुधवार (दि. ९) रात्री १२:०० पासून ते गुरुवार (दि. १०) रात्री १२:०० पर्यंत म्हणजेच सुमारे २४ तासांसाठी भामा-आसखेडमधून आळंदी शहराला होणारा संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करून पाण्याचा वापर कमी करावा व पाण्याची नासाडी करू नये. नागरिकांनी आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा उपलब्ध करून ठेवावा. या काळात पाण्याचा काटकसरीने व विवेकपूर्ण वापर करावा. कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होईल. मात्र, काही भागांत सुरुवातीला कमी दाबाने किंवा विलंबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. नगरपरिषदेने अनावश्यक पाण्याचा वापर टाळण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.