-विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास आगामी हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
देउळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने चालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढविणे, गळती रोखणे आणि केवळ पात्र व जीवंत शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, राज्यात 20 मे 2026 पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, विहित मुदतीत ही प्रक्रिया न केल्यास आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना नजीकच्या सामाईक सेवा केंद्रावर (CSC) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा ‘PM-KISAN’ मोबाईल ॲप डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी गावपातळीवर जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. पी.एम. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. दरम्यान, काही संशयित प्रकरणांतील शेतकऱ्यांचे हप्ते केंद्र शासनाने तात्पुरते स्थगित केले आहेत. फेब्रुवारी 2019 नंतर झालेले भूमी हस्तांतरण, संशयास्पद जमीन मालकी अहवाल किंवा अपूर्ण माहितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत, त्यांनी नजीकच्या सीएससी केंद्राला भेट देऊन पी.एम. किसान पोर्टलवरील Farmer’s Corner मधील Update Missing Information या पर्यायातून आवश्यक माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच संबंधित अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठविला जाणार आहे.
माहिती अद्ययावत केल्यानंतर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर संबंधित प्रकरणांची पडताळणी करून लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. लाभार्थी यादीत नाव आहे की नाही, याची माहिती शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत किंवा पी.एम. किसान पोर्टलवरून मिळू शकते. तसेच, ज्या लाभार्थ्यांचे निधन झाले आहे त्यांच्या वारसदारांनी सहा महिन्यांच्या आत मृत्यू प्रमाणपत्र कृषी कार्यालयात सादर करून संबंधित लाभ बंद करावेत. त्यानंतरच वारसदारांना नवीन नोंदणी करता येणार आहे. चिखली तालुक्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी 30 जून 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी केले आहे.