चिखली (तालुका प्रतिनिधी) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे १३२ वी जयंती आंत्रिकोळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, सचिव यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंचशील घेतली. मुख्याध्यापक अपार सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकला. तसेच यश गजानन खरात इयत्ता तिसरीतल्या मुलाने भाषण केले, त्यानंतर ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या, या वेळी गावातील लहान मुलांपासून तर अबालवृद्धांपर्यंत तसेच महिला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचा सहभाग होता. मिरवणूक काढतेवेळी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्व गावकर्यांना मिरवणूक शांततेत पार पाडा, असे आवाहन आठवले व अमोल गवई यांनी केले. ही मिरवणूक छत्रपती चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवराजे मित्रमंडळ यांनी फराळाची व्यवस्था केली होती. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदू कर्हाडे उपस्थितीत होते. सदर मिरवणूक शांततेत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून समाज मंदिरामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन महेंद्र हिवाळे यांनी केले. तसेच बंदोबस्ताला आलेले शितोळे साहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आभार प्रदर्शन अनिल हिवाळे यांनी केले. बीट जमादार रवींद्र पवार यांनी खोर, साकेगाव, वाघापूर, अंत्रीकोळी या सर्व गावांमध्ये शांततेत मिरवणूक झाल्या, असे सांगितले.