– जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारातील दुर्देवी घटना; बुलढाणा तालुक्यातील दहीद येथील राजेंद्र वाघ यांचाही मृत्यू, मृतक हे सिल्लाेड व जामनेर तालुक्यातील!
– पुलाच्या बांधकामासाठी आले होते मजूर; लहान मुलीला वाचविण्यात यश!
जालना/जाफ्राबाद (संजय निकाळजे) – जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून पाच मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शनिवारी, दि.२२ फेब्रुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. गावकर्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगार्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्देवी घटनेत बुलढाणा तालुक्यातील दहीद येथील राजेंद्र वाघ यांचादेखील मृत्यू झाला असून, दहीद गावावर शोककळा पसरली आहे. मृतक हे सिल्लोड, बुलढाणा व जामनेर तालुक्यातील असून, एकमेकांचे नातेवाईक होते.
अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणार्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू रिचवल्याने वाळूच्या ढिगार्याखाली दबून पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे मजूर झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजेदरम्यान आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले सहाजण ढिगार्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला असता, टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकर्यांना बोलावून आणले असता, त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक १२ वर्षीय मुलीला वाचविण्यात यश आले आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय ५०) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय १७) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय ४०) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय २० रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय ३८) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत. रवींद्र आनंद या ठेकदाराचे हे काम सुरु आहे. या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता, जाफ्राबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक गावकर्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये, असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकीय वरदहस्त आणि पोलिस व महसूल अधिकार्यांच्या आशीवार्दाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. त्यामुळे याला कुठेतरी पाय बंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. “ज्यावेळेस पोलीस आले आणि पंचनामा न करताच ते मृतदेह घेऊन जाऊ लागले तेव्हा गावकरी आले आणि त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला आणि मृतदेह घेऊन जाणं थांबवलं,” असं गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
“पासोडी येथे पुलाचं बांधकाम सुरु होतं. त्याठिकाणी एका टिन पत्र्याच्या शेडमध्ये त्या पुलावर काम करणारे मजूर रात्री झोपले होते. तेव्हा एका वाहनामधील वाहनचालकाने वाळू शेडशेजारी ओतली तेव्हा ती वाळू झोपलेल्या मजूरांच्या अंगावर पडली. त्यामध्ये पाच मजूर गुदमरुन मरण पावले आहेत. ते मृतदेह उचलून आपण नातेवाईकांच्या समक्ष दवाखान्यात पुढील कारवाईसाठी नेले आहेत. यामध्ये मृतांच्या नातेवाईंकाची फिर्याद घेऊन पुढील गुन्हा नोंद करण्यात येईल.”
-
पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे