फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणा; अन्यथा तीव्र आंदोलन करू!
नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्रात होत असलेला फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. परंतु, राज्यातील सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला. यामुळे महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान तर झालेच. पण सोबतच १ लक्ष तरुणांचा रोजगारही गेला. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडच्यावतीने नांदुरा तहसीलदारांना पत्र देण्यात आले.
संभाजी ब्रिगेडने पत्रात नमूद केले की, महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. परंतु आधीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की, फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यापूर्वीही राज्यात फडणवीस सरकार असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. हा महाराष्ट्रासोबत जाणीवपूर्वक केलेला द्वेषपूर्ण अन्याय आहे. फॉक्सकॉन – वेदांता ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथे होणार होता. हा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला हा महाराष्ट्रावर मोठा अन्याय आहे. तरी हा प्रकल्प तत्काळ परत महाराष्ट्रात आणावा जेणेकरून १ लाख तरुणांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटेल व यातून महाराष्ट्राला ही आर्थिक सहाय्य होईल, याच करिता आज दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी संभाजी ब्रिगेडच्यावतीने हा प्रकल्प जोपर्यंत महाराष्ट्रात परत येत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने आमचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी सांगितले. तसेच नांदुरा तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील, शिवसेना नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर, प्रमोद भगत, मोहन चिमकर, कैलास काटे, गजाननसिंग राजपूत, दीपक ढोले, गणेश भोपळे, अमोल घोराडे, भगिरथ मनस्कार, विशाल घोंगटे, सागर कळमकर, कपिल पाटील, मधुसूदन पुंडकर, सुरेशसिंग डाबेराव, गजानन वाकुडकार, अविनाश कोल्हे, भूषण श्रीखंडे, अक्षय महाले, राहुल खंडेराव, सागर जुमडे, मयूर मेढे, प्रशांत काकर, दत्तात्रय करांगळे, निखिल देशमुख व इतर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.