नीलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा; ‘तुतारी’ हातात घेऊन लोकसभेच्या मैदानात!
– राजीनामा देताना लंके रडले; पारनेरचे मतदार व अजित पवारांची मागितली माफी!
– शरद पवारांच्या रूपात देव पाहिला, त्यांच्यासाठी आमदारकी काय चीज – नीलेश लंके
पारनेर (जि.नगर)/ खास प्रतिनिधी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील लढतीत अखेर निर्णायक क्षण आला आहे. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ई-मेलद्वारे पाठवत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभेच्या मैदानात उतरत असल्याचे जाहीर केले. पारनेरमध्ये झालेल्या संवाद मेळाव्यातून त्यांनी ही घोषणा केली. मी देव पाहिला नाही, पण शरद पवार यांच्या रूपात मला देव दिसला. त्यांच्या शब्दापुढे आमदारकी काय चीज आहे, असे सांगत त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. ही घोषणा करताना लंके हे कमालीचे भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचे रडणे पाहून भरसभेतील वातावरणही प्रचंड भावूक झाले व कार्यकर्ते एकच घोषणा करू लागले. रावणाच्याही अहंकाराचा नाश झाला होता. आपली धनाढ्यांविरोधात लढाई आहे. किमान दोन लाख मतांच्या फरकाने आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे, असे लंके यांनी याप्रसंगी सांगितले. नगर (दक्षिण ) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांना उमेदवारी दिलेली असून, डॉ. सुजय हे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव आहे. त्यामुळे या मतदारसंघात गरीबविरूद्ध श्रीमंत अशी लढत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी कार्यकर्त्यांसमोर लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते भावूक झाले. दिल्लीत लोकसभेत शेतकर्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असे नीलेश लंके म्हणाले. यावेळी लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असे जाहीर केले. ‘आता शिवधनुष्य हाती घेतलं आहे. मी अजित पवारांची माफी मागतो. आता मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही. आता आपण अभिमन्यू आहोत. आपण चक्रव्युहात अडकलो आहोत. तुम्ही मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं. मात्र आता साडेचार वर्षे झाली आहेत. मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आता आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल. चार महिने कमी असताना आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी म्हणालो माझ्या लोकांना विचारू द्या’, असे सांगताना आ. लंके हे भावूक झालेत. मी देव पाहिला नाही, पण देवासारखा श्रेष्ठ माणूस ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांमध्ये मी पाहिला. त्यांनी मला सांगितले की नीलेश तूच लोकसभा निवडणूक लढ. पवार साहेबांच्या शब्दापुढे आमदारकी काय चीज आहे, असे भावनिक सुरात सांगून नीलेश लंके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इथल्या सर्वशक्तीमान सत्ताधार्यांना हरवायचं असेल तर त्याआधी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. आमदारकीचा राजीनामा देताना मला खूप वेदना होतायेत, जनतेने मला माफ करावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही माफी मागितली.
आमदार नीलेश लंके हे आता अहमदनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील त्यामुळे हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आता नीलेश लंके मैदानात उतरले आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी विखे पाटील पिता-पुत्रा विरोधात रणशिंग फुंकले आहे. या वेळी लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. रावणाचादेखील अंत झाला होता, त्यात तुम्ही कोण आहात? असा प्रश्न करत आमदार नीलेश लंके यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. नगरच्या पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप लंके यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या माध्यमातून नीलेश लंके यांनी आज आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. मी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. माझ्यामुळे तुम्हाला घाम फुटण्याची गरज काय? असा प्रश्न नीलेश लंके यांनी उपस्थित केला. दुसर्यांच्या झेंडावर पंढरपूर करणारी आमची अवलाद नाही, असे म्हणत त्यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावरदेखील टीका केली. शेतकर्यांच्या प्रश्नावर तुम्ही केलेले आजपर्यंत एक तरी भाषण दाखवा, असे आवाहनदेखील लंके यांनी सुजय विखे पाटील यांना दिले आहे.
केवळ माझ्या जवळचे होते म्हणून महसूल विभागातील ४७ कर्मचार्याच्या बदल्या करण्यात आल्या. आजची वेळ निर्णय घेण्याची वेळ आहे. शेपूट घालून बसणारी औलाद आमची नाही. माझ्यावर वारंवार वार करण्याचा प्रयत्न केला. कोणी काही म्हणू पण यंदाची निवडणूक ‘कम से कम दो लाख’ असं म्हणत २ लाख मतांनी लोकसभा निवडणुक जिंकण्याचा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्याबद्दल आपलं मतं आजही चांगलं आहे आणि उद्याही चांगलं राहील. दादांनी राजकारणात मला खूप मदत केली. आपला देश जातीपातीवर बोलायला लागला, आपल्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी मी शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य ठेवले. या महानाट्याबाबत एका पोलिसांनी आपलं मत व्यक्त केलं तर यांनी (विखे) त्या पोलिसाला निलंबित केले, असे नीलेश लंके यांनी सांगितल्यानंतर सभास्थळी संतापाची लाट निर्माण झाली होती. लंके म्हणाले, आपल्या कामाला निधी मिळाला तर अधिकार्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्री (राधाकृष्ण विखे) यांनी केला. आपल्याला जिरवाजिरवी करायला कुणी आमदार केलं नाही. माझे विरोधकदेखील म्हणतात की नीलेश लंके यांनी आम्हाला कधी त्रास दिला नाही, असेही सांगून, त्यांनी विखे पिता-पुत्रांचे कारनामेही उघड केले.
—————-