वर्धा (प्रकाश कथले) – एकत्र क्रिकेट खेळताना झालेला वाद विकोपास जात आर्वीत दोन गटांत रात्री तुफान राडा झाला. हा राडा शहरातील चौकातच झाला. त्यात एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात स्टंपनेच मारहाण केली गेली. त्यात पाच युवक जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील युवकांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. काल रात्री १० वाजताच्या दरम्यान ही हाणामारीची घटना घडली. शहरात दक्षतेची उपाययोजना म्हणून बंदोबस्त लावला गेला आहे. सध्या परिस्थिती शांत आहे.
आर्वी शहरातील एकाच वस्तीत राहणार्या काही युवकांत क्रिकेट खेळत असताना वाद होऊन हाणामारी झाली. हा वाद उपस्थितांनी मध्यस्थी करून सोडविला. वाद शमल्यानंतर दोन्ही गटांतील युवक आपापल्या घरी निघून गेले होते. त्यानंतर रात्री १० वाजताच्या दरम्यान दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद होऊन जोरात हाणामारी झाली. हाणामारीत एका युवकाच्या डोक्यावर क्रिेकेटच्या स्टंपने मारण्यात आल्याने त्याला जखम झाली. त्यानंतर त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्याला पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले गेले. वाद झालेल्या दोन्ही गटातील युवक एकाच वस्तीत राहात असून, यांच्यामध्ये विविध कारणावरून नेहमी वादविवाद होत असतात. सध्या शहरात या घटनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आर्वी पोलिसांनी दोन्ही गटांतील युवकांवर गुन्हे दाखल केले असून, शहरात शांतता आहे. पोलिस तपास करीत आहेत.