पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र होणार स्वच्छ!

editor 2 Min Read
2 Min Read

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याच्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार येणार आहे. यातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘चला जाणूया नदी’ला उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी  बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, समन्वयक नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 नद्यांच्या क्षेत्रात चला जाणूया नदीला उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. पैनगंगा नदीसोबतच नळगंगा आणि ज्ञानगंगा या नदीक्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रामुख्याने नदी क्षेत्रातील नागरिकांमध्ये नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. लोकसहभागाची ही चळवळ विविध घटकांना एकत्र करून राबविण्यात येणार आहे. नदीक्षेत्र स्वच्छ करण्यासोबतच पूरक्षेत्र, नदीतील अतिक्रमण, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपचारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी श्रमदानातून कामे करण्यात येणार आहे. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुटुंबासह एक दिवसभर श्रमदान करणार आहे. यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, रोटरी क्लब, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी  यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे चला जाणूया नदीला या उपक्रमामुळे नदीकाठील गावांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या या उपक्रमातील सहभागामुळे नागरिकांपर्यंत नदीच्या स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यास मदत होणार असल्यामुळे जिल्हा आणि क्षेत्रियस्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनी कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी केले.

Share This Article
Exit mobile version