– आमखेड येथील शेतकर्याच्या सुडी जाळल्याप्रकरणी तपास यंत्रणेला वेग द्या – प्रशांत पाटील
चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील आमखेड येथील शेतकरी कृष्णा वाघ यांची सोयाबीनची सुडी जाळल्याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची मागणी दि. ९ डिसेंबर रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यात त्यांनी दि.१ डिसेंबरच्या रात्री सुडी पेटवणार्या इसमाला शेतात असणार्या एका शेतकर्याने पुसटस बघितले असल्याने वाघ यांनी चिखली पोलीस स्टेशनला संशयास्पद व्यक्तीचा मोबाइल नंबर दिला असून, तो नंबर व त्यादिवशी त्या परिसरातील मोबाईल लोकेशन टॉवर सर्व्हीलियन्स वर घेतल्यास सदर कॉल ट्रेस करून आरोपी शोधण्यास व चौकशीस सहकार्य होईल, तरी तात्काळ सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन त्याची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड व चिखली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना तात्काळ आरोपीला शोधून कारवाई करा असे सांगात, आमखेड येथील शेतकरी कृष्णा वाघ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानीबाबत चौकशी करून धीर देत सांत्वन केले.
दि.१ डिसेंबर रोजी माझ्या शेतातील सहा एकरातील सोयाबिनची सुडी पेटवून माझे चार ते पाच लाखाच नुकसान करून वेळोवेळी हेतुपूर्वक आर्थिक नुकसान करण्यात येत असल्याने व घटना घडून दहा दिवस उलटून गेले तरीदेखील अद्याप आरोपीचा शोध लागला नसून मी चिखली पोलिस स्टेशनला गुन्हेगाराला शोधण्यासाठी वारंवार विनंती करत आहे. परंतु कुठलाच ठोस तपास होत नसल्याने मी हतबल झालो असून, माजी कृषि मंत्री सदाभाऊ खोत व राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी धीर देत त्यांनी पोलिस अधीक्षक व ठाणेदार यांना तातडीने आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे सांगितले आहे.
– कृष्णा निंबाजी वाघ, शेतकरी आमखेड
——————

