नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राला पुन्हा एकदा सर्वोच्च जबाबदारी मिळाली आहे. मावळते सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्यानंतर आता न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहेत. १९७८ ते १९८५ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड २९ मार्च ते ३१ ऑक्टोबर २०१३ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून करण्यात आली होती. २०१८ मध्ये धनंजय चंद्रचूड यांनी व्याभिचाराला गुन्हा मानणार्या कायद्याला रद्द केले होते. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला, त्यापैकी एक चंद्रचूड होते. दरम्यान, न्या. धनंजय चंद्रचूड यांना ही मोठी संधी मिळाली आहे. त्यांच्या आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार होत्या. वडील न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपद भूषवले. वडिलांचा वारसा चालवत न्या. धनंजय यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या न्यायनिवाड्यांद्वारे न्यायदान करण्याबरोबरच कायद्याच्या विद्यार्थ्यांना अध्यापन, महाराष्ट्रातील न्यायाधीशांना प्रशिक्षण, विधी व न्यायाशी संबंधित लेखन आणि विद्यापीठांमध्ये व्याख्याने असे विविधांगी काम त्यांनी केले आहे.
—————–

