आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : गेल्या ३० ते ४० वर्षांपासून खेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांना संघटित करून हे प्रश्न आम्ही शासन दरबारी मांडणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर व्यापक बैठक घेऊन पाठपुरावा करून देखील शासनाने दखल घेतली नाही तर येत्या काळात शेतकरी यांच्या हितासाठी आंदोलनाचे शस्त्र उभारून भविष्यात सर्व शेतकरी घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊ, अशी ग्वाही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिली.
खेड मधील शेतकरी यांच्याशी संवाद साधल्या नंतर ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी शेतकरी यांनी विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी विविध मागण्याची निवेदने दिली. ते म्हणाले, खेड मधील सेझबाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १४ वर्षे पासून प्रलंबित आहे. काळुस भागातील चासकमान पुनर्वसन अंतर्गत टाकलेले ७/१२ वरील शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षापासून मागणी प्रलंबित आहे. तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित चाकण पट्टयातील भामा आसखेड पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के आज देखील अनेक वर्ष संघर्ष करूनही काढण्यात आलेले नाहीत. यासाठी पाठपुरावा केला जाईल.
भामा आसखेड प्रकल्पामधील चुकीच्या धोरणामुळे पुनर्वसन क्षेत्र च्या नावाखाली तेथील बाधित शेतकऱ्यांना आजही सिंचनाची कोणतीच सुविधा मिळत नाही. परंतु कागदोपत्री असलेले आभासी लाभ क्षेत्र दाखवून त्याच्यावर अन्याय करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

